चव्हेला धरणाच्या निर्मितीमुळे वैनगंगेवर पाणी संकट
By Admin | Updated: March 29, 2015 01:25 IST2015-03-29T01:25:26+5:302015-03-29T01:25:26+5:30
जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील २३ गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत.

चव्हेला धरणाच्या निर्मितीमुळे वैनगंगेवर पाणी संकट
गडचिरोली : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील २३ गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. पाणी पुरवठा योजनेकरिता दररोज ४२ लाख लिटर पाण्याची उचल नदीतूनच होते. याच नदीवर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेजवळ चव्हेला धरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे धरण पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्यावर नवे पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणारी वैनगंगा नदी गडचिरोली जिल्ह्यातील २३ गावांसाठी जीवनदायणी ठरली आहे. दररोज या गावातील लाखो नागरिकांना पाणी पाजण्याचे काम वैनगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत व नगर पालिकांमार्फत करीत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी या तालुक्यातून जाते. देसाईगंज तालुक्यात आमगाव येथील पाणी पुरवठा योजना ४० हजार लिटर, कुरूड येथे ७५ हजार लिटर, सावंगी येथे ५० हजार लिटर, कोंढाळा येथे ७५ हजार, आरमोरी येथील पाणी पुरवठा योजना १ लाख ४० हजार लिटरची आहे.
गडचिरोली तालुक्यातील नगरी पाणी पुरवठा योजना ५० हजार लिटर, पोर्ला पाणी पुरवठा योजना १ लाख ५० हजार लिटर, पुलखल पाणी पुरवठा योजना ५० हजार लिटर, साखरा पाणी पुरवठा योजना ६५ हजार लिटर, पारडीकुपी पाणी पुरवठा योजना ७० हजार लिटर, कोटगल पाणी पुरवठा योजना दीड लाख लिटर, वसा पाणी पुरवठा योजना ७५ हजार लिटर, मुडझा पाणी पुरवठा योजना ७५ हजार लिटर, काटली पाणी पुरवठा योजना ५० हजार लिटरची आहे.
हे सर्व पाणी वैनगंगा नदीतूनच घेतले जाते. चामोर्शी तालुक्यातही चामोर्शीची पाणी पुरवठा योजना ६ लाख लिटर, मार्र्कंडा २ लाख लिटर, कुनघाडा ५ लाख ५० हजार लिटर, हळदी माल २० हजार लिटर, आष्टी २ लाख ५० हजार लिटर, गणपूर रै. ७५ हजार लिटर, ठाकरी पाणी पुरवठा योजना ७० हजार लिटर, वाघोली पाणी पुरवठा योजना ६० हजार लिटर, तुकूम पाणी पुरवठा योजना ४० हजार लिटर, लखमापूर बोरी योजना १ लाख लिटरची आहे. या सर्व गावांना मुबलक पाणी पुरवठा करून वैनगंगा नदीवर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या उपसा सिंचन योजना सुध्दा सुरू आहे.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ७० ते ८० गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा पाणी शेती सिंचनासाठी मिळणार आहे. मात्र तेलंगणा राज्यात चव्हेला धरण झाल्यास वैनगंगा नदीचे पूर्ण पाणी पळविले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नदी कोरडी होण्याचे संकट कोसळून पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहे. तेलंगणा सरकार सध्या या धरणासाठी महाराष्ट्राचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा म्हणून युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा काम सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मात्र या धरणाच्या कामाबाबत कुठेही गंभीर असल्याचे चित्र दिसून येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये धरणाविषयी भीतीचे वातावरण आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
वैनगंगा असे देते नळ योजनेला पाणी
गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांमध्ये ५० हजार व ३५ हजार लोकसंख्येला पाणी पाजण्याचे काम वैनगंगा नदीवरील पाणी पुरवठा योजना करते.
गडचिरोली तालुक्यातील ९ गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना ७ लाख ३५ हजार लिटर पाणी नदीवरूनच दररोज उपलब्ध होत आहे.
चामोर्शी तालुक्यातील १० पाणी पुरवठा योजनांंना १९ लाख १२ लिटर पाणी देते.
देसाईगंज तालुक्यात ४ गावांना २ लाख ४० हजार लिटर व आरमोरी तालुक्यात १४ लाख लिटर पाणी वैनगंगा दररोज देत आहे.
चव्हेला धरणाचे काम प्राणहिता नदी सीमेवरील चपराळा भागात सुरू असल्याने चामोर्शी, अहेरी, सिरोंचा या तीन तालुक्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागातील शेतीचे पाणी पळविले जाणार असून पावसाळ्यातही पुराची परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यासाठी बिकट होईल.
- रघुनाथ तलांडे, अध्यक्ष, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती