वैनगंगा आटली, जिल्ह्यावर जलसंकट
By Admin | Updated: January 16, 2016 01:48 IST2016-01-16T01:48:49+5:302016-01-16T01:48:49+5:30
कमी प्रमाणात पडलेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी ...

वैनगंगा आटली, जिल्ह्यावर जलसंकट
गडचिरोली : कमी प्रमाणात पडलेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी व वाढलेल्या पाणी पुरवठा योजना यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच तब्बल दोन फुटाने घटला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय गडचिरोली शहराला येण्यास सुरूवात झाली आहे. नदीमधील इंटेकवेलचा एक पाईप पूर्णपणे पाण्याच्या वर आला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून गडचिरोली शहराला दिवसातून केवळ एकदाच पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
गडचिरोली शहराला दररोज ७५ लाख लिटर पाण्याची गरज
गडचिरोली शहराची सद्यस्थितीत लोकसख्ंया ५० हजार एवढी आहे. गडचिरोली शहरात एकूण सहा हजार पेक्षा अधिक नळ कनेक्शन असून दर दिवशी ७५ लाख लिटर (७.५ एमएलडी) पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी जॅकवेलवर १०० हॉर्सपॉवरची मशीन बसविण्यात आली असून सदर मशीन एका तासाला पाच लाख लिटर पाण्याचा उपसा करते. मात्र पाणी पातळी घटल्याने मशीनची पाणी उपसा करण्याची क्षमता घटली आहे. दिवसरात्रभर मशीन सुरू ठेवल्यानंतरही ३० लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याचा उपसा होत नाही. त्यामुळे गडचिरोली शहराला दिवसातून एकवेळाच पाणी पुरवठा केला जात आहे.
पहिल्यांदाच जलपातळीने ओलांडली मर्यादा
गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे बांधकाम २००३ साली करण्यात आले. तेव्हापासून १२ वर्षांच्या कालावधीत गडचिरोली शहराला मुबलक पाणी पुरवठा होत होता. मात्र यावर्षी पहिल्यांदाच इंटेकवेलचा एक पाईप पूर्णपणे जलपातळीच्या वर आला आहे. दुसरा पाईप सद्यस्थितीत पाण्यात बुडून असला तरी एप्रिल, मे महिन्यात जलस्तर दुसऱ्याही पाईपाच्या खाली जाऊन पाईप उघड्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास इंटेकवेलच्या पलिकडे एखादा छोटेखानी बंधारा बांधल्याशिवाय गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणे कठीण होणार आहे.
वैनगंगा नदीची पातळी घटल्याने जॅकवेलमध्ये कमी प्रमाणात पाणी जमा होत आहे. इंटेकवेलच्या एका पाईपाच्या जलस्तर खाली गेला आहे. दुसरा पाईप पाण्यामध्ये आहे. मात्र त्याच्या अध्या भागापर्यंत गाळ साचला आहे. त्यामुळे त्या पाईपातूनही पाणी येण्यास अडचण निर्माण होत आहे. पाण्यामध्ये बुडून असलेल्या पाईपासभोवतालचे गाळ काढले जाणार आहे. यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असून तोपर्यंत शहराला एकच वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे.
- उमेश शेंडे, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद गडचिरोली