व्यंकटापूर विकासात वेटिंगवरच
By Admin | Updated: May 28, 2015 00:56 IST2015-05-28T00:56:11+5:302015-05-28T00:56:11+5:30
तालुक्यापासून २५ किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूरचा विकास झाला असता तर हे गाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले असते.

व्यंकटापूर विकासात वेटिंगवरच
प्रतीक मुधोळकर अहेरी
तालुक्यापासून २५ किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूरचा विकास झाला असता तर हे गाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले असते. मात्र अजूनपर्यंत या गावाला मूलभूत सोयीसुविधांसाठीच प्रशासनाने वेटिंगवर ठेवले आहे. याचा त्रास गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
व्यंकटापूर हे दोन डोंगर व प्राणहिता नदीच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले गाव आहे. या गावात ऐतिहासिक मंदिर असून शेकडो वर्षांपूर्वी एका झाडात व्यंकटेश्वर स्वामींची मूर्ती निघाली. तेव्हापासून या गावाला व्यंकटापूर हे गाव पडले आहे. शिवरात्रिनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून जत्रेला आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात. या गावांमध्ये असलेले शुद्ध पाण्याचे सहा कुंड येथील विशेष आकर्षण आहे. या कुंडांमुळे हे गाव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या गावाचा विकास झाला असता तर एक मोठे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले असते. मात्र घनदाट जंगलात वसलेल्या या गावाला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून चिखल राहत असल्याने वाहनाने मार्गक्रमण करणे कठिण होते. जवळपास पावसाळ्यातील बहुतांश दिवस या मार्गावरून वाहतूक बंद राहत असल्याने या गावाचा संपर्क तुटतो. एका खासगी कंपनीला रस्ता बांधकामाचे काम देण्यात आले होते. मात्र नक्षल्यांनी वाहनाची जाळपोळ केली. तेव्हापासून रस्त्याचे काम करण्यास कोणताही कंत्राटदार तयार नाही. अहेरी आगारातून यामार्गे बसेस सोडल्या जातात. मात्र पावसाळ्यात या बसही बंद राहतात.
गावातील विजेची समस्या वर्षभर चालणारी आहे. एकदा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर दोन ते तीन दिवस वीजच येत नाही. गाव नदीजवळ असले तरी नळ योजना नाही. एका विहिरीवर संपूर्ण नागरिक तहान भागवितात. उन्हाळ्यात या विहिरीचे पाणी कमी झाल्यानंतर गावातील नागरिकांनी प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गावातून २७५ क्रमांकाचा राज्य महामार्ग जातो व तो सरळ सिरोंचाला जाऊन मिळतो. मात्र सदर महामार्ग कच्चा आहे. या गावात आदिवासी विकास विभागाच्या मार्फत आश्रमशाळा चालविली जाते. मात्र या आश्रमशाळेत अनेक समस्या आहेत. शिक्षक नेहमीच गैरहजर राहत असल्याने याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर झाला आहे. गावात भरपूर प्रमाणात पशुधन असले तरी वैद्यकीय अधिकारी गावाला भेट देत नाही व पशुपालकांना मार्गदर्शनही करीत नाही. परिणामी पशुधन दुर्मिळ झाले आाहेत. विविध दाखल्यांसाठी नागरिकांना तलाठी व ग्रामसेवकाची वाट बघावी लागते. ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेले व्यंकटापूर हे गाव प्रशासनाच्या वक्रदृष्टीमुळे विकासात पिछाडले असल्याचे दिसून येते.
टाळी वाजविताच कुंडातून निघतात बुडबुडे
व्यंकटापूर गावासभोवती सहा शुद्ध पाण्याचे कुंड आहेत. या कुंडामध्ये वर्षभर पाणी राहते. महत्त्वाचे म्हणजे टाळी वाजविताच या कुंडातील पाण्यामधून प्रचंड प्रमाणात बुडबुडे बाहेर पडतात. या निसर्गाच्या चमत्काराचा भूगर्भ वैज्ञानिकांनी सखोल अभ्यास केला. मात्र या बुडबुड्यांमागील रहस्य अजूनपर्यंत त्यांच्या लक्षात आले नाही. आजही तो कुतुहलाचा विषय ठरला आहे. या कुंडांना भेट देण्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक या गावाला भेट देतात. जाण्यासाठी चांगला रस्ता असता तर हे गाव एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस आले असते.