वाहन नादुरूस्त; गावात अंधार
By Admin | Updated: January 29, 2015 23:07 IST2015-01-29T23:07:41+5:302015-01-29T23:07:41+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील वाहन मागील अडीच महिन्यांपासून नादुरूस्त अवस्थेत पडून असल्याने धानोरा व कोरची तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार पसरला आहे.

वाहन नादुरूस्त; गावात अंधार
अल्लाउद्दीन लालानी - धानोरा
येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील वाहन मागील अडीच महिन्यांपासून नादुरूस्त अवस्थेत पडून असल्याने धानोरा व कोरची तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार पसरला आहे. वाहनच नसल्याने शेकडो किमी अंतरावरच्या गावांमध्ये जावे कसे, हा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
गडचिरोली येथून धानोरा येथे मुख्य लाईनच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जातो. धानोरा येथील सबस्टेशनच्या माध्यमातून धानोरा व कोरची तालुक्यात विद्युत पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही तालुक्यातील सर्वच गावे घनदाट जंगलाने व्यापलेली व दुर्गम आहेत. या गावांनाही विद्युत पुरवठा करण्यात येते. गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-कोटगुल ही ११५ किमी अंतर असलेली विद्युत वाहिनी आहे. अंतर जास्त असल्याने या वाहिनीत कधी बिघाड निर्माण होईल, हे सांगता येत नाही. त्याचबरोबर चातगाव-कारवाफा-पेंढरी, धानोरा-मोहली-रांगी यासुद्धा विद्युत लाईन आहेत. धानोरा येथून धानोरा तालुक्यातील २२२ गावे व कोरची तालुक्यातील ४८ गावांना विद्युत पुरवठा करण्यात येतो.
वीज पुरवठ्यात बिघाड निर्माण झाल्यास त्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी धानोरा येथील उपविभागीय कार्यालयाला स्वतंत्र चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र सदर वाहन १७ नोव्हेंबर २०१४ रोजी बिघडले आहे. सदर वाहन दुरूस्त करून देण्यात यावे, अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र कंपनी याकडे दुर्लक्ष झाले आहे.
वाहन उपलब्ध नसल्याने शेकडो किमी अंतर कसे जावे, हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आहे. काही विद्युत विभागाचे कर्मचारी स्वत:ची दुचाकी घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी जात आहेत. मात्र बऱ्याच वेळा बिघाड मोठा असल्यास चार ते पाच कर्मचाऱ्यांना जावे लागते. अशावेळी दुचाकीने जाणे अशक्य होत आहे.