ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:34 IST2020-12-31T04:34:26+5:302020-12-31T04:34:26+5:30

राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची ...

Two and a half thousand nominations from six talukas for 1653 Gram Panchayat seats | ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन

ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन

राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासाठी ३ ते ४ ग्रामपंचायत मिळून एक टेबल अशी व्यवस्था केली होती. एकेक उमेदवार संबंधित टेबलवर जाऊन आपला अर्ज देत होता. त्या टेबलवरील कर्मचारी अर्जाची तपासणी करून त्यातील त्रृटी काय आहेत त्या सांगून तो अर्ज स्वीकारत होते. त्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती.

विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात जेवढे अर्ज आले त्यापेक्षा जास्त अर्ज शेवटच्या दिवशी आल्याने रात्री ९ वाजतानंतरही सायंकाळी ५.३० वाजता कार्यालयाच्या आवारात असलेल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरूच होते.

नामांकन दाखल केलेल्या इच्छुाकांच्या अर्जातील त्रुटी गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या आधी दूर करून अर्ज परिपूर्ण करावे लागणार आहे. तसे करू न शकलेल्यांचे अर्ज छाननीत बाद होतील. गडचिरोलीत तलसील कार्यालयाशेजारील गोंडवाना कला दालनाच्या सभागृहात अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय देसाईगंज, आरमोरी, धानोरा, कुरखेडा आणि कोरची येथे तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप टाकून ही व्यवस्था केली होती.

आज अर्जांची छाननी, १५ ला मतदान

पहिल्या टप्प्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात ६ तालुक्यांचा समावेश आहे. गुरूवारी (दि.३१) सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी सुरू होईल. त्यात किती अर्ज वैध आणि किती बाद झाले हे निश्चित होईल. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.

ग्रामीण भागातील उमेदवारांची तारांबळ

अर्ज स्वीकारण्यासाठी किती वेळ लागू शकतो याची कल्पना नसणारे ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवार रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयात ताटकळत होते. अर्ज स्वीकारेपर्यंत त्यांना बाहेरही पडणे शक्य नसल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणते यात अनेक महिला उमेदवारही होत्या.

Web Title: Two and a half thousand nominations from six talukas for 1653 Gram Panchayat seats