कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा टिप्पर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:28+5:30
सदर अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही. या टिप्परमधील दोन व्यक्ती अपघात होताच पळून गेले. जखमी चालकाला आरमोरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. वैरागड परिसरातून खरेदी केलेले चार जनावरांना एमएच-४९-एटी-५०१७ क्रमांकाचा टिप्पर वैरागड-रामाळा मार्गावरून भरधाव वेगात हात होता.

कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा टिप्पर उलटला
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड-रामाळा मार्गावरून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा भरधाव टिप्पर उलटल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वैरागडनजीक घडली.
सदर अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही. या टिप्परमधील दोन व्यक्ती अपघात होताच पळून गेले. जखमी चालकाला आरमोरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. वैरागड परिसरातून खरेदी केलेले चार जनावरांना एमएच-४९-एटी-५०१७ क्रमांकाचा टिप्पर वैरागड-रामाळा मार्गावरून भरधाव वेगात हात होता. रामाळा रोपवनाजवळ सदर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर रस्त्याच्या बाजूला उलटला.
सदर वाहनाचा वेग इतका जास्त होता की, रस्त्यालगतच्या खड्ड्यात या वाहनावरील जनावरे पडली. तसेच टिप्पर रोपवनाचे तार व खांब तोडून फरफटत गेले. घटनेची माहिती मिळताच रोपवनात कर्तव्यावर असलेले वनरक्षक के.एस.गिलनवार, विकास शिवणकर व आरमोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी नैताम यांनी घटनास्थळ गाठून जखमी चालकाला वाहनाच्या बाहेर काढले. आरमोरीच्या ग्रामीण रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले आहे. सदर वाहनातील इतर दोन इसम फरार असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
अशी वाहने सुसाट वेगानेच धावतात
वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या बऱ्याच भागातून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जाते. वैरागड-आरमोरी मार्गावरही गेल्या दोन-तीन महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून कत्तलीसाठी जनावरांची खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. खरेदी व्यवहार आटोपल्यानंतर जनावरांना वाहनात कोंबल्या जाते. त्यानंतर पोलीस व इतर यंत्रणेपासून वाचण्यासाठी जनावरे भरलेले वाहन सुसाट वेगाने नेले जाते. त्यामुळे या भागात अशा वाहनांचे अपघात वाढले आहे.