पुराचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:35+5:30
यावर्षी सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पुरामुळे दोन ते तीन वेळा रोवणी झालेले धानपीक वाहून गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला होता. अशातच पुन्हा चार दिवसांपूर्वी पूर आला. याही पुरात होत्याचे नव्हते झाले. कापूस, सोयाबिन पिकांमध्ये पाणी शिरल्याने ही पिके नष्ट झाली आहेत.

पुराचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सतत चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये पाणी शिरल्याने याचा फटका पिकांना बसला आहे. दोन वेळा धानाची रोवणी केल्यानंतरही पुराने पीक वाहून गेल्यानंतर आता काही शेतकऱ्यांनी रोवणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सतत शुक्रवारपर्यंत पाऊस सुरू होता. बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी पिकांमध्ये शिरले. सतत तीन दिवस पीक बुडून असल्याने काही पिके कुजून नष्ट झाली आहेत. काही ठिकाणचे पीक वाहून गेले. यावर्षी सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पुरामुळे दोन ते तीन वेळा रोवणी झालेले धानपीक वाहून गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला होता. अशातच पुन्हा चार दिवसांपूर्वी पूर आला. याही पुरात होत्याचे नव्हते झाले. कापूस, सोयाबिन पिकांमध्ये पाणी शिरल्याने ही पिके नष्ट झाली आहेत. गुड्डीगुडम परिसरातील तिमरम निमलगुडम, झिमेला, नंदीगाव, मोसम, गोलाकर्जी, रायगट्टा या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. नुकसानीचे पंचनामे केले जातात. मात्र अत्यंत कमी मदत संबंधित शेतकºयाला दिली जाते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीपासून रोवण्यांना सुरूवात झाली होती. रोवणे नियमित वेळेत झाल्याने पीक चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून होता. मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. पुराचा फटका बसलेली शेती आता पडीक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मेडिगड्डा धरणाचा अंकिसा परिसरातील शेतीला धोका
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडिगड्डा धरण बांधले आहे. अवेळी धरणाचे पाणी सोडले जाते. सदर पाणी शेतीमध्ये शिरत असल्याने शेतकºयांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या धरणाच्या पाण्याचा अंकिसा, आसरअल्ली परिसरातील शेतकºयांना कोणताच फायदा नाही. उलट नुकसान होत आहे. शासनाने अंकिसा परिसरातील नडिकुडा, कोतापल्ली, चिंतारवेला, अंकिसा, लक्ष्मीदेवी पेठा, गेर्रापेल्ली, बोराईगुडम, आसरअल्ली, सुंकरअली, टेकडा मोटला, गुमलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे घोषित करून जमिनीच्या मोबदल्यात दुसरी जमीन द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अशी मागणी चंद्रशेखर पुलगम, समय्या तोरकर, सडवली गड्डुरी, सांबम सोमनपल्ली, दामोधर सपिडी, पापय्या पाले, धर्मय्या कोठारी, नारायण पाले, जयराम चौधरी यांनी केली आहे.