देसाईगंजातील कृषी केंद्रांची कसून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:01:01+5:30

२० जून रोजी कृषी विभागाने यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यात तिवरी गावातील एका कृषी केंद्रावर धाड टाकून बोगस डीएपी खताच्या २०० बॅग जप्त केल्या. त्यानंतर देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथे बोगस खत निर्मितीचा कारखाना असल्याचा सुगावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लागला. कुरूड येथील पूजा अ‍ॅग्रोक्राप प्रा. लि. कंपनीमध्ये पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याने धाड टाकली.

A thorough investigation of agricultural centers in Desaiganj is underway | देसाईगंजातील कृषी केंद्रांची कसून चौकशी सुरू

देसाईगंजातील कृषी केंद्रांची कसून चौकशी सुरू

ठळक मुद्देकृषी विभागाचे पथक सज्ज : खत व बियाण्यांच्या साठ्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज शहरातील कृषी केंद्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून बोगस बियाणे मिळत असल्याने खरीप हंगाम सुरू होताच दरवर्षी कृषी विभागाकडून चौकशी होत असते. मात्र यंदा बोगस खत मिळत असल्याचा गुन्हा दाखल झाल्याने कृषी विभागाची झोप उडाली असून वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील कृषी केंद्रांमधील खत व बियाणांच्या साठ्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
२० जून रोजी कृषी विभागाने यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यात तिवरी गावातील एका कृषी केंद्रावर धाड टाकून बोगस डीएपी खताच्या २०० बॅग जप्त केल्या. त्यानंतर देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथे बोगस खत निर्मितीचा कारखाना असल्याचा सुगावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लागला. कुरूड येथील पूजा अ‍ॅग्रोक्राप प्रा. लि. कंपनीमध्ये पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याने धाड टाकली. दरम्यान बोगस डीएपी खताची निर्मिती करताना दोन आरोपीसह १६१ बॅग खत जप्त करण्यात आले. या प्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये हैदराबाद येथील हर्ष फर्टिलायझर इंडस्ट्रिजच्या बॅगमध्ये डीएपी खताचा साठा उपलब्ध करून दिला आहे किंवा नाही, याची तपासणी केली जात आहे. देसाईगंजला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा लागून असून येथे एकमेव रेल्वेस्टेशन आहे. परिणामी आजूबाजूचे शेतकरी खत, बियाणे व कीटकनाशक खरेदीसाठी देसाईगंज येथे येत असतात. मात्र मागील काही वर्षांपासून येथील कृषी केंद्रांमध्ये बोगस बियाणे मिळत असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान ब्रह्मपुरी, लाखांदूर, अर्जुनी, नागभिड, आरमोरी व देसाईगंज येथील न्यायालयाने कृषी केंद्राच्या काही मालकांवर बोगस बियाणे संदर्भात गुन्ह्याखाली शिक्षा व दंड सुनावण्यात आली. त्यामुळे संबंधित कृषी केंद्र संचालकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

२०१३ मध्ये नकली बियाण्यांचे प्रकरण आले होते उजेडात
१३ जून २०१३ रोजी काही कंपन्यांचे प्रमाणीत प्रमाणपत्र नसताना बियाण्यांची विक्री केल्याचे आढळून आले होते. दरम्यान कृषी विभागाच्या पथकाने देसाईगंज शहरातील कृषी केंद्रांमध्ये धाड टाकून १ लाखापेक्षा अधिक किंमतीचे नकली बियाणे जप्त केले होते.

शहरातील कृषी केंद्रांमध्ये नियमित चौकशी सुरू आहे. यात खत, बियाणे व कीटकनाशक यांचा साठा व बिल याची खातरजमा केली जात आहे. आणखी १०-१२ दिवस ही चौकशी सुरू राहणार आहे.
- तानाजी खरडे,
उपविभागीय कृषी अधिकारी
देसाईगंज

Web Title: A thorough investigation of agricultural centers in Desaiganj is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती