रेशनवर नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या झाल्या सुस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:40 IST2024-12-03T14:40:04+5:302024-12-03T14:40:37+5:30
नावालाच निवड : जबाबदारीकडे होतेय दुर्लक्ष

The Vigilance Committees that controlled the ration became lax
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष, सचिव, सदस्य निवडल्याच गेल्या नाहीत तर कुठे नामधारी समित्या असल्याने रेशन दुकानातील दक्षता समिती केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे.
ग्राम पातळीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रेशन दुकानांतून वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्याकरिता अध्यक्ष, सचिव, सदस्य अशी १२ अशासकीय पद असलेले दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या. अशासकीय समितीमध्ये गावातील अध्यक्ष सरपंच, तलाठी, सचिव, सदस्यांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी, तीन महिला, विरोधी पक्षाचे दोन सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी, अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता इत्यादींचा समावेश आहे.
या सर्वांचा कालावधी केवळ तीन वर्षांकरिता असतो. तीन वर्षे पूर्ण झाली की नव्याने ग्रामसभेद्वारे अशासकीय पदाधिकारी यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर प्रत्येक महिन्यातून एकदा बैठक घेतली जाते. नियमित बैठका घेऊन बैठकीचा अहवाल तहसीलदार यांना पाठवावा लागतो. सर्व दक्षता समित्यांच्या बैठका वेळच्या वेळी घेतल्या जातात किंवा नाही याची खातरजमा जिल्हास्तरावरील अपर जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. मात्र दक्षता समितीतील अशासकीय सदस्यांनी एकही बैठक वा भेटी रास्त भाव दुकानदारांना दिले गेले नसल्याचे निदर्शनास दिसून येते. दक्षता समितीतील पदाधिकारी केवळ आता नामधारी ठरले आहेत.
ही आहेत दक्षता समितीची कामे
शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून केला जातो किंवा नाही तपासणे, बनावट, खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी याबाबत आढावा घेणे, धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे, गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक कार्ये दक्षता समितीमार्फत पार पाडली जातात