शंकरनगरसह चार गावात तेंदू हंगामावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:54+5:30
आरमोरी तालुक्याच्या शंकरनगर, पळसगाव, पाथरगोटा व सावलखेडा येथील नागरिकांनी लॉकडाऊनमुळे यावर्षीचा तेंदूपत्ता हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार गावातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

शंकरनगरसह चार गावात तेंदू हंगामावर बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : खरीप हंगामातील आर्थिक अडचण दूर करणारा व हमखास उत्पन्न देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता हंगामाची ओळख आहे. यावर्षी अनेक गावांमध्ये तेंदू संकलनाचे काम सुरू झाले आहे. मात्र आरमोरी तालुक्याच्या शंकरनगर, पळसगाव, पाथरगोटा व सावलखेडा येथील नागरिकांनी लॉकडाऊनमुळे यावर्षीचा तेंदूपत्ता हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार गावातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
देशभरात लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमाचे पालन केले जात आहे. बऱ्याचअंशी शिथिलता देण्यात आली असली तरी चार गावांनी यावर्षी तेंदूपत्ता संकलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. पावणेदोन महिन्यापासून ग्रामीण भागातही नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. जिल्ह्यात बहुतांश तेंदूपत्ता कंत्राटदार नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातून येतात. तेंदूपत्ता कंत्राटदारांचे व्यवस्थापक, सहायक व कर्मचारी गावात आल्यास त्यांच्यापासून गावातील नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, शंकरनगर, पळसगाव, पाथरगोटा व सावलखेडा आदी गावांनी गाव बंदी कायम ठेवली आहे. त्यातच पळसगाव, पाथरगोटा येथे तेंदू फळ्या पेसा क्षेत्रातील पर्याय क्रमांक २ च्या असल्याने तेंदूपत्ताला जादा भाव मिळणार होता. शंकरनगर येथील अनेक कुटुंब दरवर्षी २० ते ३० हजार रूपयांची कमाई तेंदूपत्ता संकलनातून करतात. याच मिळकतीवर नागरिक खरीप हंगामातील बियाणे, खते तसेच लागवडीचा खर्च करतात. परंतु पावणेदोन महिन्यांपासून आदी चार गावातील नागरिकांनी गावबंदी कायम ठेवली आहे. उपाशीपोटी भाकरीला ठोकर मारण्याचे धाडस करण्याचाच प्रकार या गावात घडत आहे. गावशेजारी स्थानिक कंत्राटदारांकडून तेंदूपत्ता संकलन केले जात असताना या चार गावातील नागरिकांनाही त्यात सहभागी करण्याचे ठरविण्यात आले. परंतु याला नागरिकांनीच नकार दिला. या चार गावातील नागरिकांच्या निर्णयामुळे खरीप हंगामातील त्यांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या निर्णयाची परिसरात प्रशंसाही केली जात आहे.
जोगीसाखरा व सालमाऱ्यात तेंदू हंगाम सुरू
जिल्ह्यातील तेंदूपत्ता कंत्राटदारांमार्फत जोगीसाखरा येथील पर्याय क्र.१ चे तेंदू संकलन ६ मे पासून सुरू झाल्याने येथील मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. सालमारा या पेसा गावात पर्याय क्र.१ ची तेंदूसंकलन फळी गावापलिकडे ठेवण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक २ ची पेसा अंतर्गत फळी संकलन केंद्र गावातच ठेवण्यात आले आहे. गावकऱ्यांना पेसा गावातील तेंदू संकलन व त्याचे फायदे या संदर्भात संबंधितांकडून प्रशिक्षण अथवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने पेसा गावात दोन फळ्या निर्माण करण्यात आल्या. परंतु पर्याय क्रमांक २ चे कंत्राटदार नागपूर येथील असल्याने त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील व्यवस्थापक व सहायकांना तेंदू हंगाम प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामात लावल्याची माहिती आहे.