जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिरे घ्या

By Admin | Updated: June 23, 2014 00:06 IST2014-06-23T00:06:21+5:302014-06-23T00:06:21+5:30

पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Take public awareness and preventive camps | जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिरे घ्या

जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिरे घ्या

पशुधन संवर्धन विभागाची बैठक : कृषी व पशुसंवर्धन सभापतींचे अधिकाऱ्यांना निर्देश
गडचिरोली : पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावागावात पशुधन रोगासंबंधी जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची बैठक जि. प. च्या सभागृहात पार पडली. सभापती गण्यारपवार पुढे बोलतांना म्हणाले की, पावसाळी हंगामात पशुसंवर्धन विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची जनजागृती पथनाट्यातून करावी. तसेच पशुसंवर्धन मेळावे घेऊन गुरांचे रोग प्रतिबंधात्मक शिबिरे, शेतकऱ्यांच्या गृहभेटी असे उपक्रम राबवून पशुसंवर्धनाची सेवा पोहोचविण्याचे निर्देश दिले. कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत जंतनाशक शिबिरे, गोचीड, गोमाशा निर्मुलन शिबिरे, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांचे मलमुत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन करणे या सव्र उपक्रमाचा जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर व बेरोजगाार युवक पशुपालकांना लाभ पोहोचविण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना जनावरांकरिता पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असलेल्या औषधी विषयी मार्गदर्शन करावे, असे निर्देश सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिले. प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुरले यांनी पॉलिक्निनिकवर आपल्या गुरांना नेऊन रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन पशुपालकांना केले. प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिरीष रामटेके यांनी खरीप हंगामाच्या कालावधीत विनापरवानगीने कोणीही मुख्यालयी गैरहजर राहू नये व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पशुपालकांना जागृत करून पशुपालकांची गृहभेट घेऊन गुरांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्याला काही दिवसातच सुरूवात होत असल्याने दरम्यान जनावरांवर अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपाययोजना म्हणून जनावरांच्या आरोग्यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात एकटांग्या, चौखुरा, घटसर्प यासह अनेक आजार जनावरांना होतात. दूषित पाण्यामुळे अनेक जनावरेही दगावतात व साथ रोगाचीही शक्यता पावसाळ्यात अधिक असते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Take public awareness and preventive camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.