नागरिकांच्या सहकार्याने निवडणूक तणावमुक्त करण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:30+5:30
यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागरिकांच्या सहकार्याने निवडणूक तणावमुक्त करण्यात यश
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षानंतर एवढी शांत आणि तणावमुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक पार पडली. जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफकडून नक्षलविरोधी अभियानासोबतच राबविल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. या जिल्ह्यात सर्वाधिक समस्या रोजगाराची आहे. त्यामुळे आम्ही विविध माध्यमांतून युवकांना स्वयंरोजगार देऊन आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना काहीच येत नाही त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहे. आतापर्यंत तलाव खोलीकरण, नवीन हातपंप, सोलर लाईट, शिवणयंत्रांचे वाटप, कुक्कुटपालन व्यवसायासाठी हातभार अशी अनेक कामे सीआरपीएफने या जिल्ह्यात केली असून आम्ही येथे आहे तोपर्यंत ती पुढेही सुरू राहतील असे डीआयजी रंजन म्हणाले. यावेळी सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, उपकमांडंट कैलास गंगावने हे उपस्थित होते.
शेजारच्या राज्यामुळे नक्षलवाद जिवंत
गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद बराच कमी झाला असला तरी शेजारच्या राज्यांमध्ये तो टिकून आहे. त्याची झळ या जिल्ह्याला बसत असल्याचे यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांची शिबिरे लागायची. अनेक दिवस त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा. आता ती स्थिती नाही. नक्षलवाद्यांना एक दिवसही गावाजवळ राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुढील काही काळात या जिल्ह्यातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.