जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय कॅबिनेटमध्ये नेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:28+5:30
गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ना.देशमुख पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. हैदराबादवरून हेलिकॉप्टरने येथे आल्यानंतर त्यांनी विश्राम भवनात विविध संघटनांच्या वतीने निवेदने स्वीकारून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय कॅबिनेटमध्ये नेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : या जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण ६ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर नेण्यासंदर्भात काही संघटनांनी आपल्याला निवेदन देऊन मागणी केली. ही मागणी रास्त असून हा विषय आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ना.देशमुख पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. हैदराबादवरून हेलिकॉप्टरने येथे आल्यानंतर त्यांनी विश्राम भवनात विविध संघटनांच्या वतीने निवेदने स्वीकारून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आ.धर्मरावबाबा आत्राम, पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर ना.देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची माझीही इच्छा होती. पण आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिल्यामुळे मी या जिल्ह्यात येत राहील. जिल्ह्यातील समस्या टप्प्याटप्प्याने दूर केल्या जातील. त्यात रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य आहे. सुरजागड लोहखाणीच्या प्रक्रिया उद्योगाचे काम कुठे अडले आहे याबाबत लॉयड्स मेटल्सच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावू, असे ना.देशमुख म्हणाले.
बिंदूनामावलीमुळे अडलेली गडचिरोली जिल्ह्यातील भरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मेडिगड्डा धरणात तेलंगणा सरकारने मार्किंग केले होते त्यापेक्षा जास्त पाणी अडविल्याने बॅक वॉटर शेतकऱ्यांच्या शेतात गेले. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आपण परिस्थिती जाणून घेतल्याचे ते म्हणाले.
धान भरडाईसंदर्भात भुजबळांशी बोलणार
इतर जिल्ह्यांच्या धानाच्या मागणीअभावी येथे धान भरडाई थांबून धान खरेदीवर परिणाम झाला. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात विकास कामातील योगदानासाठी सिरोंचा येथे स्व.आर.आर.पाटील यांचा पुतळा उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे ना.देशमुख म्हणाले.