वादळाने धानाचे पीक कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:53+5:30
वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.

वादळाने धानाचे पीक कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सोमवारी सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी धान कोसळले आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे बोअर व सिंचन विहिरी आहेत. तसेच गोदावरी, प्राणहिता नदीजवळ जमीन असलेले शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यावर्षी आजपर्यंत वातावरण चांगले असल्याने उन्हाळी धानपीक जोमाने वाढले होते. त्यामुळे उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत असतानाच सोमवारी रात्री सिरोंचा तालुक्यात मेघ गर्जना व जोराच्या वादळासह पाऊस झाला. वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी होत आहे.
खरीप धानाच्या तुलनेत उन्हाळी धानाच्या लागवडीचा खर्च अधिक राहते. वेळोवेळी पाणी द्यावे लागत असल्याने मोटारपंपाचे वीज बिलाचाही भरणा करावा लागतो. तसेच उन्हाळ्यात धानावर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने कीटक नाशकांचाही खर्च अधिक राहते.
फळबागा व इतर पिकांनाही बसला फटका
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा, वडधम, रंगयापल्ली, झिंगानूर, रेगुंठा, मोयाबीनपेठा या परिसरात प्रामुख्याने धानपिकाबरोबरच मिरची, मका, कापूस, आंबा आदी फळबाग पिकांचेही उत्पादन घेतले जाते. सोमवारी झालेल्या वादळामुळे आंबे जमिनीवर तुटून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरची पिकाचा शेवटचा तोडा सुरू आहे. काही शेतकºयांनी सदर मिरची वाळविण्यासाठी टाकली असताना वादळामुळे मिरची उडून गेली. तर काही मिरचीचे ढीग पाण्यातही सापडले. त्यामुळे मिरची पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. मात्र तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.