विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:11+5:30
प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र सदर बससेवा परवडत नसल्याच्या कारणावरून महामंडळाच्या वतीने या बसगाडीमध्ये इतरही प्रवासी बसविले जातात. परिणामी प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.
आष्टी भागातील जि.प.सदस्य रूपाली पंदिलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या नेतृत्त्वात ठाकरी, इल्लूर, कुनघाडा व चपराळा आदी गावातील विद्यार्थ्यांनी आष्टी येथील एसटीच्या नियंत्रकांना भेटून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून आष्टी भागातील सदर चार ते पाच गावांमध्ये मानव विकास मिशनच्या बसगाड्या थांबवून विद्यार्थिनींना शाळेच्या गावापर्यंत पोहोचविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आष्टी परिसरातील ठाकरी, इल्लूर, कुनघाडा, चपराळा येथील जवळपास २०० विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी येथे ये-जा करीत असतात. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने बसगाड्यांमध्ये कोंबून नेले जाते. बरेचदा बसमध्ये जागा शिल्लक नसल्याच्या कारणावरून बसचालक बसगाड्या प्रवाशी थांब्यावर थांबवित नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते. महामंडळाच्या चालक व वाहकाच्या अशा प्रकारामुळे आष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा महामंडळाच्या विरोधात आंदोलन करणार, असा इशारा संजय पंदिलवार यांच्यासह विद्यार्थिनींनी दिला आहे.
यापूर्वी भोगनबोडी मार्गे येणारी बस चपराळापर्यंत जात होती. ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी, मार्र्कंडा (कं.) या बसथांब्यावर जलद बसगाड्या विद्यार्थ्यांसाठी थांबविण्यात याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.