सिराेंचाने जपला ब्रिटिशकालीन इमारतींचा वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST2021-03-25T04:35:28+5:302021-03-25T04:35:28+5:30
सिराेंचा येथे पूर्वी नवाबांचे राज्य हाेते. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळातही हे शहर ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पसंतीचे हाेते. दंडकारण्यातील हा प्रदेश ...

सिराेंचाने जपला ब्रिटिशकालीन इमारतींचा वारसा
सिराेंचा येथे पूर्वी नवाबांचे राज्य हाेते. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळातही हे शहर ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पसंतीचे हाेते. दंडकारण्यातील हा प्रदेश विकसित हाेता. येथे अनेक इमारती, धार्मिक स्थळे, सामाजिक केंद्रे अजूनही अस्तित्वात आहेत. सिराेंचा हे प्राणहिता नदीच्या काठी वसले आहे. तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे इतकी मजबूत आहेत की त्यांच्या निर्मितीची कला वाखाणण्याजाेगी आहे. शहरातील विठ्ठलेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, वली हदरशाह दर्गा, आसरअल्ली मार्गावरील चर्च, धार्मिक स्थळे शतकाहूनही जुनी आहेत. सिराेंचातील विश्रामगृह, सोमानापल्लीचे विश्रामगृह, कोप्पेलाचे विश्रामगृह हे सर्व ब्रिटिश काळात बांधले गेले. मात्र यापैकी कोप्पेलाच्या विश्रामगृहाची जाळपोळ माओवाद्यांंनी करून नासधूस केली. विशेष म्हणजे काही इमारती आता सरकारी कार्यालये म्हणून वापरली जात आहेत. त्यापैकी पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, रिक्रिएशन क्लब (सध्याचे दूरदर्शन केंद्र), जुना दवाखाना भवन, हवामान केंद्र, चिट्टूर रेस्ट हाऊस, एफडीसीएमची इमारत या सर्व इमारती ही ब्रिटिशकालीन वारसा आहेत. काही इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इमारतींचे नूतनीकरण करून त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. यात शेतकरी भवन, कृषी गोडावून, पाटबंधारे विभागाचे क्वाॅर्टर आणि आसरअल्ली रोडवरील वीज उपकेंद्रासमोर असलेल्या दुमजली इमारतीचा समावेश आहे. प्रशासन त्यांचे नूतनीकरण करून वापर करू शकते.
बाॅक्स
पर्यटनाला वाव
सिराेंचा तालुक्यात बरीच नैसर्गिक केंद्रे असून, ती पर्यटन क्षेत्रे म्हणून विकसित आणि वापरता येतील. यामध्ये सोमनूरचा संगम, बामणीचा धबधबा (धबधबा), पातगुडाम ते कोरलादरम्यान नदीतील खडकांची मालिका, जितम धबधबा यांचा समावेश आहे. तेलंगणा राज्याने आपल्या भागातील धार्मिक, नैसर्गिक क्षेत्र विकसित करून पर्यटक आणि भाविकांसाठी उघडे केले आहे. त्या आधारावर मिळणारा महसूल वर्षाकाठी कोटींमध्ये असल्याची माहिती आहे. केंद्रांच्या विकासाचा फायदा तेथील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार सिराेंचा तालुक्यातील पर्यटनाला वाव मिळाल्यास राेजगार उपलब्ध हाेऊन विकास हाेऊ शकताे. मात्र याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.