‘शेकाप’ही उतरणार मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:31+5:30
जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मिळाली नाही.

‘शेकाप’ही उतरणार मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : काँग्रेस आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने जिल्ह्यातील तीनही मतदार संघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह तीनही मतदार संघातील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान नामांकन दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असताना अहेरी मतदार संघातील ‘सस्पेन्स’ बुधवारी रात्री दूर करत विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नावावर अखेर भाजपने शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे आता या मतदार संघात पुन्हा जुन्याच पद्धतीने लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवारी गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात भाजप व काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर बुधवारी अहेरीचा तिढा सुटेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र संध्याकाळपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ होती. मात्र रात्री उशिरा अम्ब्रिशराव यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त धडकले. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाने गडचिरोली मतदार संघावर दावा करताना ही जागा आपल्याला देण्याची मागणी केली होती. परंतू शेकापला ही जागा न मिळाल्यामुळे तीनही जागांवर उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती समितीने घेतला असल्याचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी कळविले.
शिवसेनेचे अस्तित्व पणाला
जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मिळाली नाही. त्यामुळे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहणार का, असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
शेवटच्या दिवशी होणार गर्दी
प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपैकी काही उमेदवार दि.३ ला नाममात्र नामांकन दाखल करणार आहेत. मात्र एबी फॉर्मसह आणि शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांनी ४ आॅक्टोबरचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे नामांकनाच्या शेवटच्या दिवशी सर्वच मतदार संघात निवडणुकीचा माहौल गरम राहणार आहे.