लॉकडाऊनमध्ये दिला रोहयोने आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:07+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनामार्फत चालविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोरोना साथीच्या उद्रेकावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश उद्योग, व्यवसाय, सेवा बंद पडल्या. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला.

लॉकडाऊनमध्ये दिला रोहयोने आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला होता. या कालावधीत रोजगार हमी योजना कामाला आली. १ एप्रिल ते २१ जून या कालावधीपर्यंत जिल्हाभरात ११ लाख ४ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. यामुळे कोरोनाच्या कालावधीत आर्थिक संकट थोडेफार कमी होण्यास मदत झाली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनामार्फत चालविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोरोना साथीच्या उद्रेकावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश उद्योग, व्यवसाय, सेवा बंद पडल्या. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला. याची झळ गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनाही बसली. ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगारासाठी येणारे नागरिक बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित राज्यांना दिले. त्यानुसार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली. खरीप पूर्व हंगामाची कामे सुरू होण्यापूर्वीपर्यंत रोजगार हमी योजनेच्या कामांवर जिल्ह्यातील हजारो मजूर काम करीत होते. १ एप्रिल ते २१ जून या कालावधीत सुमारे ११ लाख ४ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. तेंदूपत्ता संकलन हा जिल्ह्यातील सर्वात मोठा व्यवसाय मानल्या जाते. लॉकडाऊनमुळे याही व्यवसायाचे कंबरडे मोडले. अनेक ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याचे लिलावच झाले नाही. परिणामी तेंदूपत्त्यावरील मजुरही रोजगार हमीच्या कामात व्यस्त झाले.
३४९ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार
प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला रोजगार हमी योजनेंतर्गत वर्षभरात १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला नसतानाही त्या कुटुंबातील सदस्याने रोजगाराची मागणी केल्यास व प्रशासन रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम नसल्यास त्या कुटुंबाला बेरोजगारीभत्ता देण्याची तरतुद आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध होण्यास विशेष महत्त्व आहे.
रोजगार हमी योजना ठरताहे वरदान
गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे स्थानिक मजुरांसाठी वरदान ठरत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची मागणी होते.