प्रकल्पस्थळीच वस्तीचे पुनर्वसन करा
By Admin | Updated: May 31, 2014 23:28 IST2014-05-31T23:28:33+5:302014-05-31T23:28:33+5:30
आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून

प्रकल्पस्थळीच वस्तीचे पुनर्वसन करा
चव्हेलावासीयांची मागणी : कोसरी प्रकल्पातील बुडीत गावांचे प्रश्न सुटणार काय?
वैरागड : आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून गाजावाजा करून सुरू आहे. परंतु सिंचन प्रकल्पाची अवस्था अतिशय बिकट आहे. ज्या कोसरी प्रकल्पाचे ३३ वर्षानंतर काम सुरू करण्यात आले. त्या बुडीत क्षेत्रात येणार्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायमच आहे, असे असतांनाही कोसरी प्रकल्पाचे काम सुरू करण्याची कल्पना कुणाची असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत.
कोसरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये येणार्या चव्हेला गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याचे शासनाव्दारे प्रयत्न करण्यात आले. पण येथील नागरिकांनी पुनर्वसनाला स्पष्ट नकार दिला. ज्या प्रकल्पासाठी आम्हाला घरदार सोडावे लागणार आहे, या प्रकल्पाच्या पाण्यावरच इतर गावातील शेतकर्यांच्या जीवनात सुख येणार आहे. तर आम्ही बेघर कसे होणार या प्रकल्पाचे पाणी ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी आम्हाला जमीन देऊन पुनर्वसन करावे, अशी भावनिक साद नागरिक घालत आहेत. परंतु नागरिकांचे पुनर्वसन न करताच कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचे काम कुणाच्या डोक्यातील कल्पना आहे, असा प्रश्न चव्हेला व परिसरातील नागरिक करीत आहेत. कोसमी लघुपाटबंधारे योजनेमुळे ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तरीपण या भागातील नागरिक सांगतात की कोसरी प्रकल्पाजवळ असलेल्या मांगदा या गावाला सिंचनाचा कोणताच फायदा होणार नाही. मांगदा येथील संतोष वालोदे म्हणतात की, कोसरी प्रकल्पाची कल्पना कोणी आणि कशी साकार केली हे कळायला मार्ग नाही या प्रकल्पामुळे जवळच्या गावाला लाभ नाही. त्या प्रकल्पावर कोट्यवधी रूपये खर्च करून कोणता फायदा होणार.
मानापूर, देलनवाडी आणि थोडाफार नागरवाही गावाचा भाग या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात येणार आहे. कोसरी प्रकल्पाबद्दल मांगदा, मानापूर, देलनवाडी येथील नागरिकांच्या अनुकूल प्रतिक्रीयाही नाही. या प्रकल्पामुळे या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. पण वनव्याप्त क्षेत्राची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे असे मत देलनवाडी येथील भामराज हष्रे यांनी व्यक्त केले. सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. पुनर्वसन अन्यत्र ठिकाणी करण्याच्या विरोधात येथील नागरिक ठाम आहेत. (वार्ताहर)