लग्नास नकार दिल्याने प्राचीला विहिरीत ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:01:07+5:30
कोपरअल्ली व पिलीगुडम ही दोन्ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. दोन्ही गावांमध्ये २० किमीचे अंतर आहे. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांच्या गावाला जात होते. घटनेच्या दिवशी आरोपी हा दारू पिऊन होता. त्या दिवशी त्याने प्राचीकडे शारीरिक सुख व लग्नाची मागणी केली. मात्र या दोन्ही गोष्टीला प्राचीने नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी जयदेवने प्राचीला विहिरीत धक्का देऊन ढकलले.

लग्नास नकार दिल्याने प्राचीला विहिरीत ढकलले
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : प्रेमसंबंध असतानाही प्राचीने लग्नास नकार दिल्याने आपण तिला विहिरीत ढकलले, अशी कबुली आरोपी जयदेव निरंजन सरदार (२२) रा. कोपरअल्ली याने पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष विहिरीजवळ आरोपीला नेऊन कबुली जबाबाची खातरजमा केली.
पिलीगुडम येथील विहिरीत १५ दिवसांपूर्वी प्राची बारसागडेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात तिचा प्रियकर जयदेव सरदारचा सहभाग असल्याची माहिती प्राचीच्या मैत्रिणीने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी जयदेवला त्याच्या घरून २२ जून रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यादरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, प्राची ही जयदेवच्या गावातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. दोघांमध्ये पाचव्या वर्गापासून प्रेम होते. २०१७ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रेमात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा प्रेमाचे सूत जुळून आले.
कोपरअल्ली व पिलीगुडम ही दोन्ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. दोन्ही गावांमध्ये २० किमीचे अंतर आहे. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांच्या गावाला जात होते. घटनेच्या दिवशी आरोपी हा दारू पिऊन होता. त्या दिवशी त्याने प्राचीकडे शारीरिक सुख व लग्नाची मागणी केली. मात्र या दोन्ही गोष्टीला प्राचीने नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी जयदेवने प्राचीला विहिरीत धक्का देऊन ढकलले. ती विहिरीत कोसळली व पाण्यात बुडून मरण पावली, अशी माहिती आरोपी जयदेवने पोलिसांना दिली. घटनेचा तपास एटापल्लीचे एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्रीकांत चव्हाण, पोलीस हवालदार रमेश सिडाम, नापोशि उमेश सुरजागडे, पोलीस शिपाई गणेश वेलादी करीत आहेत.
मृतदेह पाण्याच्या वर काढून बांधला दगड
राग व दारूच्या नशेत मोठी चूक झाल्याचे जयदेवच्या लक्षात आल्यानंतर १५ ते २० मिनिटातच त्याची दारूची नशा पूर्णपणे उतरली. प्राचीच्या हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये, प्राचीने स्वत:च आत्महत्या केली, असे त्याला दाखवायचे होते. त्यासाठी ज्या विहिरीत त्याने प्राचीला ढकलले त्या विहिरीला उतरण्यासाठी लोखंडी कड्या आहेत. या कड्यांच्या मदतीने तो विहिरीत उतरला. प्राचीचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तिच्या हातातील कंगण काढून टाकले. तसेच एक दगड बांधून पुन्हा मृतदेह विहिरीच्या पाण्यात सोडला. मृतदेह पाण्याच्या वर येऊ नये यासाठी त्याने हे केल्याचे पोलिसांना सांगितले.
अन् छकुलीला तातडीने करावे लागले लग्न
प्राचीच्या हत्येत तिची मैत्रीण छकुली व तिचा प्रियकर या दोघांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी घटनेच्या वेळी हे दोघेही हजर होते. घटना तर घडून गेली. मात्र याविषयी कुणाला माहिती होऊ नये, यासाठी जयदेव प्रयत्न करीत होता. छकुली ही तिच्याच गावची असल्याने ती गावात गेल्यानंतर हा प्रकार सांगेन, या भितीने छकुलीला तिच्या प्रियकराने लग्नासाठी तगादा लावला. दोघांनीही बोलेपल्ली-चंदनवेली मार्गावरील एका शिवमंदिरात लग्न केले. हा संपूर्ण घटनाक्रम सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घडला.