प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:38 IST2018-04-28T00:38:36+5:302018-04-28T00:38:36+5:30

खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये नवीन विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध प्रलोभने दिली जात आहेत. इयत्ता चौर्थी व सातवीचा निकाल अद्यापही लागला नसतानाही इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी ग्रामीण भागात शिक्षक गृहभेटी देऊन पालकांची मनधरणी करीत आहेत.

Recitation of students for admission | प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मनधरणी

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मनधरणी

ठळक मुद्देखासगी शाळांची कसरत : शिक्षक लागले विद्यार्थी शोधमोहिमेच्या कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये नवीन विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध प्रलोभने दिली जात आहेत. इयत्ता चौर्थी व सातवीचा निकाल अद्यापही लागला नसतानाही इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी ग्रामीण भागात शिक्षक गृहभेटी देऊन पालकांची मनधरणी करीत आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या रोडावत असतानाच खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनाही याचा फटका बसत आहे. अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्या असते. शिक्षक आपली नोकरी धोक्यात येऊ नये म्हणून आत्तापासूनच कामाला लागले आहेत.
ग्रामीण भागातील अनुदानित शाळांतील शिक्षक गावखेड्यात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांची मनधरणी करीत आहेत. विशेष म्हणजे अद्यापही इयत्ता चौथी व सातवीचा वार्षिक निकाल जाहीर झालेले नाही. असे असताना आत्तापासूनच शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची बुकिंग केली जात आहे. खासगी अनुदानित शाळांतील प्रत्येक शिक्षकांना एक प्रकारचे टार्गेटच दिले जाते. या टार्गेटनुसार प्रत्येक शिक्षक विशिष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेत करणे अनिवार्य असते. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी काही अडचणी असल्यास त्या जाणून घेत सोडविण्याचे आश्वासनही शिक्षकांकडून दिले जाते.
नवीन शैक्षणिक सत्रात इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी शिक्षकांना नवीन विद्यार्थी भरतीकरिता विशेष धडपड करावी लागते. पूर्वी विद्यार्थी प्रवेशासाठी एवढी धडपड करावी लागत नव्हती. परंतु बहुतांश खेड्यातील विद्यार्थी शहरात शिकण्यास प्राधान्य देत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. त्यामुळे एकदा शाळेत प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक सुस्कारा टाकतात.
सायकलींसह गणवेश
खासगी अनुदानित, विना अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशास काही अडचणी असल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जातो. विशेषत दोन ते तीन किमी अंतरावरील विद्यार्थ्यांना सायकल तसेच गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची जबाबदारी शिक्षक घेतात.

Web Title: Recitation of students for admission