वादळासह मुसळधार पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:20+5:30
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे पाऊस येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. गडचिरोली शहरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जवळपास ५ वाजेपर्यंत अधूनमधून पाऊस कोसळत होता. आरमोरी शहर व तालुक्यात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळासह पाऊस झाला. जवळपास दीड तास पावसाने झोडपून काढले.

वादळासह मुसळधार पावसाचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारी गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागाला वादळी वाऱ्याने झोडपून काढले. वादळाने अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही मार्गांवरची वाहतूक ठप्प पडली.
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे पाऊस येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. गडचिरोली शहरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जवळपास ५ वाजेपर्यंत अधूनमधून पाऊस कोसळत होता. आरमोरी शहर व तालुक्यात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळासह पाऊस झाला. जवळपास दीड तास पावसाने झोडपून काढले. देसाईगंज तालुक्यात सायंकाळच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस झाला. अहेरी परिसरातही वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने या परिसरातील अनके झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घरांवरील टिनाचे छप्पर उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुरखेडा तालुक्यातही हलका पाऊस झाला. सोमवारी होळी व मंगळवारी धुलिवंदन आहे. ढगाळ वातावरण कायम आहे. दरदिवशी कुठे ना कुठे पावसाच्या सरी कोसळत आहेत. धुलिवंदनाच्या दिवशी सुध्दा पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस झाल्यास धुलिवंदनाच्या आनंदावर विरजन पडण्याची शक्यता आहे.
विटाभट्ट्यांचे नुकसान
जानेवारी महिन्यांपासून घरांचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे विटांची मागणी वाढली असल्याने विटा बनविल्या जात आहेत. देसाईगंज परिसरात पावसाने झोडपून काढले. त्यामुळे विटाभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. जळत असलेल्या विटाभट्ट्या विझल्या. त्यामुळे विट काळी पडण्याची शक्यता आहे. एकदा काळी पडलेली विट पुन्हा भाजली तरी ती पक्की होत नाही. त्यामुळे ग्राहक ती खरेदी करीत नाही. परिणामी विटाभट्टी मालकाला तोट्याचा सामना करावा लागणार आहे.
सततच्या ढगाळ वातावरणाने उन्हाळी धान पिकावर तसेच भाजीपाल्यावर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.