रस्ता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:50 IST2018-06-10T23:50:52+5:302018-06-10T23:50:52+5:30

रस्ता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोट्यवधी रूपयांच्या किमतीचे आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र पर्यवेक्षीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध योजनेअंतर्गत मोठमोठ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र बऱ्याच मार्गाचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने पूर्ण होणारे हे रस्ते किती वर्ष वाहतुकीसाठी टिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सरफेस लेवलचे काम करण्यात आले नाही. साईडवर्कसही करण्यात आले नाही. पुरेशा प्रमाणात डांबराचा वापर या कामात होत नसल्याचे दिसून येते. डेफ्थ इस्टिमेटनुसार सदर रस्त्याचे काम होत नसल्याची बाब उजेडात आली आहे. महिनाभरापूर्वी झालेले काही भागातील डांबर अल्पावधीतच उखडल्याचे दिसून येते.
अहेरी उपविभागाच्या दौऱ्यादरम्यान आपण आलापल्ली-सिरोंचा महामार्गाच्या डांबरीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सदर काम हे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे दिसून आले. येथे साहित्याचा वापरही पुरेशा प्रमाणात होत नसून या कामाची पाहणी संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेकडून करण्यात आली नाही. सदर कामाची चौकशी करावी, अशी मागणी आहे.
- रवींद्र वासेकर,
जिल्हाध्यक्ष, राकाँ, गडचिरोली