देवलमरी भागातील खराब रस्त्यांची अडचण दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:53+5:30
व्यंकटापूरला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असले तरी रस्ता व पुलाअभावी हा भाग विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित होता. पक्के रस्ते नसल्याने या भागात राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही सुरळीत चालत नव्हती. पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे सदर भागातील अनेक मार्ग बंद राहत असतात. दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अहेरी तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटत होता.

देवलमरी भागातील खराब रस्त्यांची अडचण दूर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : देवलमरी-व्यंकटापूर तसेच व्यंकटापूर-लंकाचेन या मार्गाचे डांबरीकरणाचे काम सुरू असून पुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने पावसाळ्यातील सदर भागातील आवागमनाची अडचण दूर होणार आहे.
व्यंकटापूर हे निसर्गरम्य व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी टाळी वाजविले की, पाण्याचे बुळबुळे बाहेर निघतात. व्यंकटापूरला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असले तरी रस्ता व पुलाअभावी हा भाग विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित होता. पक्के रस्ते नसल्याने या भागात राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही सुरळीत चालत नव्हती. पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे सदर भागातील अनेक मार्ग बंद राहत असतात. दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अहेरी तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटत होता. हा भाग अतिदुर्गम व संवेदनशील असल्याने येथे एकही कंत्राटदार रस्ते व पुलाचे काम करण्यासाठी तयार होत नव्हते. मात्र एका कंत्राटदाराने देवलमरी-व्यंकटापूर-लंकाचेन मार्गाचे व पुलाचे काम करण्यास तयारी दर्शवून हे काम हाती घेतले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कंत्राटदाराच्या वतीने रस्ता व पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील आवागमन व दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने व्यंकटापूर, आवलमरी, लंकाचेन या गावातील व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.