फूड बँकेच्या माध्यमातून गरीब व गरजूंची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:43+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही तसेच त्यांना दुसरीकडे कामालाही जाता येत नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशा विवंचनेत तालुक्यातील गरीब व सर्वसामान्य कुटुंब सापडले होते.

फूड बँकेच्या माध्यमातून गरीब व गरजूंची सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : कोरोनाच्या संचारबंदीमुळे सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कुटुंबावर उपासमारीची पाळी होऊ नये, याकरिता तहसील कार्यालय व नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने नगर पंचायत परिसरात फुडबँक सुरू करण्यात आली आहे. या फुडबँकेच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांना आवश्यक साहित्य उपलब्ध होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही तसेच त्यांना दुसरीकडे कामालाही जाता येत नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशा विवंचनेत तालुक्यातील गरीब व सर्वसामान्य कुटुंब सापडले होते. दरम्यान प्रशासनाच्या वतीने अहेरी नगर पंचायतमध्ये फूडबँक उपक्रम सुरू करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते या फूडबँकेचे उद्घाटन करण्यात आले. अहेरी, नागेपल्ली, आलापल्ली परिसरात परराज्यातून, पररजिल्ह्यातून कामासाठी आलेले कामगार, ट्रक चालक, गरजू व गरीब नागरिकांसाठी येथून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत आहेत. उद्घाटनाप्रसंगी नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित गोरगरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या संचारबंदीत शासन व प्रशासनाच्या वतीने अडकलेल्या नागरिकांसाठी तसेच सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांसाठी अन्नधान्य वितरण, स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य, सामाजिक संघटनांच्या वतीने भाजीपाला व आर्थिक मदत केली जात आहे. मात्र अहेरी तालुक्यातील लोकसंख्येचा आवाका बघता ही मदत कमी आहे. त्यामुळे अहेरी शहरातील व तालुक्यातील दानशुरांनी मदतीसाठी हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
दानशुरांनी मदतीसाठी पुढे यावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात मोठे संकट निर्माण झाले आहे. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत आवश्यक ती मदत करण्यासाठी सामाजिक संघटना व तालुक्यातील दानदात्यांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे, असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.