प्लास्टिकमुक्तीचा संकल्प
By Admin | Updated: January 6, 2015 23:00 IST2015-01-06T23:00:47+5:302015-01-06T23:00:47+5:30
नगरपालिकेला उशिरा का होईना, प्लास्टिकच्या दुष्परिणामाविषयी जाग आली असून गडचिरोली नगर परिषदेने संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत प्लास्टिक

प्लास्टिकमुक्तीचा संकल्प
दुकानदारांना नोटीस : शहरात व्यापक प्रमाणात जनजागृती
गडचिरोली : नगरपालिकेला उशिरा का होईना, प्लास्टिकच्या दुष्परिणामाविषयी जाग आली असून गडचिरोली नगर परिषदेने संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत प्लास्टिक न वापरण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील बहुतांश दुकानदार व नागरिक प्लास्टिकचा अनावश्यक वापर करतात. त्यामुळे शहरी कचऱ्यात सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे असल्याचे दिसून येते. प्लास्टिकचे किमान ५०० वर्षे विघटन होत नसल्याने भविष्यात प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासाठी घातक ठरू शकतो, ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर यापूर्वीच बंदी आणली आहे. याची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रत्येक महानगरपालिकेला व नगर परिषदेला देण्यात आले आहेत. मात्र गडचिरोली नगर परिषदेने सदर सूचना आजपर्यंत फारशी गांभिर्याने न घेता, प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला. त्यामुळे शहरवासीयांकडून प्लास्टिकचा अनावश्यक वापर सुरूच ठेवला होता.
डम्पिंग यार्डमध्ये प्लास्टिकचाच कचरा सर्वाधिक असून सदर कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशक्य झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर गडचिरोली नगर परिषद प्रशासनाचे डोळे उघडले. प्लास्टिकच्या वापरावर बंदी न घातल्यास भविष्यात फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, हे लक्षात आल्यानंतर प्लास्टिकमुक्तीचा संकल्प नगर परिषदेने केला आहे.
प्लास्टिकमुक्तीला नागरिकांचा सहभाग लाभावा, यासाठी शहरातून ध्वनीक्षेपक, पत्रके यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. भाजीपाला घेण्यासाठी जाताना कापडी पिशवी घेऊनच जावे, अनावश्यक प्लास्टिकचा वापर करू नये, घरातील प्लास्टिक नालीमध्ये न फेकता कचराकुंडी किंवा घंटागाडीमध्येच टाकावे, प्लास्टिक फेकून देताना आढळून आल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
त्याचबरोबर शहरातील भाजीपाला विक्रेते, हॉटेल दुकानदार, किराणा दुकानदार, जनरल स्टोअर्स यांना नोटीस बजावून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदांरावर ५०० रूपयांचा दंड ठोकण्याचाही इशारा दिला आहे. नागरिकांना प्लास्टिकच्या वापराची सवय झाली आहे. ही सवय तोडण्यासाठी नगर परिषदेला दंड व जनजागृती या दोन्ही साधनांचा परिणामकारक वापर करावा, अन्यथा प्लास्टिक निर्मूलन फार्स ठरण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)