१५ दिवसांपासून केंद्रावर धान पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:33+5:30
घोट येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ४० किलोच्या कट्ट्यावर अडीच किलो अधिकचे धान्य घेतले जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे १५ दिवसांपासून सदर शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यात आला नाही. उलट व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात आहे. या केंद्रावर भोंगळ कारभार सुरू असून शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदीची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

१५ दिवसांपासून केंद्रावर धान पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरु असलेल्या घोट येथील विकास सहकारी भात गिरणीच्या धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांच्या धानाचा काटा लवकर करण्यात येतो. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचे धान मोजले जात नाही. त्यांना प्रतीक्षाच करावी लागते, असा आरोप सिमुलतला येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केला.
घोट येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ४० किलोच्या कट्ट्यावर अडीच किलो अधिकचे धान्य घेतले जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे १५ दिवसांपासून सदर शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यात आला नाही. उलट व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात आहे. या केंद्रावर भोंगळ कारभार सुरू असून शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदीची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अनेक शेतकरी येथील खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्याकरिता येत आहेत. परंतु त्यांच्या धानाचा काटा करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या धान खरेदीची योग्य सोय करावी, अशी मागणी माजी सरपंच श्यामल मंडल, विमल हाजरा, रतन पाईक, शेखर रॉय, भण्णाजीत मंडल, सुरेश मिस्त्री अमला बिश्वास, शंकर मल्लीक, निरंजन मैत्र, रंजीत मंडल, गौरंग हलदर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
रेगडी आविका संस्थेचे कार्यालय व गोडावूनला ठोकले कुलूप
चामोर्शी तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत येणाऱ्या रेगडी आविका संस्थेचे व्यवस्थापक भोंगळ कारभार करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी गोडावून व कार्यालयाला कुलूप ठोकले. रेगडी खरेदी केंद्राअंतर्गत बोलेपल्ली, हेटलकसा, रेगडी, देवदा, गरंजी, वेंगनूर, पुल्लीगुंडम, अडंगेपल्ली, सुरगाव आदी नऊ गावे येतात. या संस्थेत व्यवस्थापक पदावर मनोहर भोवरे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी तीन वर्षांपासून प्रती कट्टा पाच रुपये प्रमाणे अवैध रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केली तसेच २०१२-१३ व २०१६-१७ या दोन वर्षातील बारदाण्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांकडून हमालीची रक्कमही घेतली, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी सभा घेऊन १९ डिसेंबरला नारेबाजी करीत कार्यालय व धान गोडाऊनला कुलूप ठोकले. यासंदर्भात मनोहर भोवरे यांची विचारणा केली असता, चामोर्शीच्या सहायक निबंधकाकडून चौकशी झाली आहे. या चौकशीत काहीच तथ्य न आढळल्याचे त्यांनी सांगितले.