दीड वर्षातही पूर्ण झाला नाही, एक किलाेमीटरचा महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:00 AM2022-01-17T05:00:00+5:302022-01-17T05:00:21+5:30
कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन कंत्राटदाराने पावसाळ्यात दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरू केली. मात्र, पावसामुळे अनेक अडथळे निर्माण हाेत हाेते. परिणामी दुसरी बाजू अजूनही पूर्ण झाली नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहरातून चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला दीड वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र, या मार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. एकाच बाजूने वाहने न्यावी लागत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊन अपघात वाढले आहेत.
गडचिराेली-चामाेर्शी-आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी चाैकापासून सुरुवात करण्यात आली. कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन कंत्राटदाराने पावसाळ्यात दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरू केली. मात्र, पावसामुळे अनेक अडथळे निर्माण हाेत हाेते. परिणामी दुसरी बाजू अजूनही पूर्ण झाली नाही. दुसऱ्या बाजूला खाेदकाम करून ठेवले आहे. यात पावसाचे माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर या मार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कंत्राटदारावर काेणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
रस्ता बंद ठेवून नालीचे बांधकाम
रस्त्याचे काम केले नाही; मात्र नालीचे बांधकाम केले जात आहे. ताेच मनुष्यबळ जर रस्ता बांधकामासाठी वापरला असता तर आतापर्यंत या मार्गाचे कामही झाले असते. मात्र, कामात नियाेजनाचा अभाव असल्याने कधी काेणते बंद करून दुसरेेच काम सुरू हाेईल याचा नेम राहिलेला नाही.
बाजूचे नागरिक व दुकानदारांना यातना
मागील दीड वर्षापासून या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. अनेक दिवस रस्ता खाेदून ठेवला आहे. यात पाणी साचल्याने त्यातून वाट काढत आपल्या घराकडे जाणे कठीण हाेत आहे. अनेकांना आपली चारचाकी, दुचाकी वाहने दुसऱ्याच्या घरी ठेवून गुडघाभर पाण्यातून घर गाठावे लागत आहे.
ज्या बाजूला काम झाले नाही. त्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरविली. परिणामी अनेकांचे धंदे बुडाले आहेत.