नगर पंचायती रखडल्या
By Admin | Updated: November 26, 2014 23:07 IST2014-11-26T23:07:05+5:302014-11-26T23:07:05+5:30
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने राज्यातील तालुका मुख्यालयाच्या गावांमध्ये नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात

नगर पंचायती रखडल्या
गडचिरोली : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने राज्यातील तालुका मुख्यालयाच्या गावांमध्ये नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आठ गावांमध्ये नगर पंचायती निर्माण होणार होत्या. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचे काम रखडलेले आहे.
काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारने राज्यातील मोठ्या गावांमधील तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला जाणार होता. याबाबत अधिसूचना जारी करून नागरिकांकडून हरकतीही मागण्यात आल्या होत्या. मात्र वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही नगर पंचायतीच्या स्थापनेबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारची ही घोषणा हवेतच विरली आहे. आरमोरी व चामोर्शीला नगर पालिकेचा दर्जा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात मागील नागपूर अधिवेशनात उपोषणही करण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने नगर पंचायती निर्माण करण्याचे पिल्लू सोडून नवीन नगर पालिका निर्माण करण्याचे कामही प्रलंबित ठेवले आहे.
नगर पंचायती निर्माण झाल्यास संबंधीत ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीमध्ये वाढ होईल व या गावांच्या विकासावर चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रीत करता येईल, अशी राज्य सरकारची भूमिका होती. परंतु या प्रश्नावर पुढे कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. अलिकडेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रमही काही भागात राज्य सरकारने घोषित केला. त्यामुळे सरकार आता नव्याने या निर्णयावर अंमलबजावणी करते की काय, अशी शक्यता आहे. राज्यात सत्तांतरण होऊन भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. आघाडी सरकार असतांना आरमोरीला नगर पालिकेचा दर्जा द्यावा म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे उपोषण केले होते. आता त्यांनी राज्य सरकारवर दबाव ठेवून आरमोरी व चामोर्शी या दोनही ग्रामपंचायतींचे नगर पालिकेत रूपांतर करावे, अशी मागणी जनतेने केली आहे.
२५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात ही नगर पंचायत स्थापन होईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वच तालुका मुख्यालय नगर पंचायतसाठी पात्र ठरतील, असे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनीही जाहीर केले होते. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)