मुस्लीम समाजाची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:36+5:30
इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

मुस्लीम समाजाची जिल्हा कचेरीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.
जिल्हाभरातील मुस्लिम समाजाचे नागरिक सकाळपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात जमले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना मुस्लिम समाजाचे नेते भारतीय मुस्लिम परिषदेचे जावेद पाशा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हातात तिरंगी झेंडा घेतलेले नागरिक केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात घोषणा देत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख, डॉ.चंदा कोडवते, रोहिदास राऊत, भावना वानखेडे, हसनअली गिलानी, नगरसेवक सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे आदी हजर होते. शासनाने कायद्यात सुधारणा केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
मोर्चाचे नेतृत्व समशेर खान पठाण, वसीम खान पठाण, हाजी इब्राहिम रहमततुला, सय्यद बाबु कादरी, लियाकत सय्यद, मुबारक सय्यद, सोहेब पटेल, एजाज खॉ पठाण, जमीर कुरेशी, जुबेर खान, शहबाद शेख, हामीद शेख, वसीम शेख, बरकत शेख, मुस्ताक शेख, शुजा खान, फारूख शेख, इम्ररान मदनी, शोहेब खान, सर्फराज शेख, इसराईल पठाण, रहिम शेख, इकरार कुरेशी, आपताब खान आबिद सय्यद, हानी समीर सय्यद, सुलेमान लाखानी आदींनी केले.
चोख बंदोबस्त, वाहतूकही वळविली
मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चादरम्यान न्यायालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत चारचाकी वाहने, ट्रकला बंदी घालण्यात आली होती. ही वाहतूक सेमानामार्गे वळविण्यात आली होती. आयटीआय चौक, बाजार चौक, जिल्हा परिषद, सर्कीट हाऊस मार्ग या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून व या मार्गाने वाहने येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेदरम्यान या मोर्चासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फूल देऊन सन्मान करण्यात आला.
या आहेत मागण्या
केंद्र शासनाने पारित केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे, यामुळे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने हा कायदा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून केली. तसेच दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून विद्यापीठातील निर्दोष विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्याचाही निषेध करण्यात आला.