पोटातील बाळासह मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:06 IST2019-05-27T00:04:53+5:302019-05-27T00:06:08+5:30

रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यात रविवारी सकाळी घडली. प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत येत असलेल्या सेवारी उपकेंद्रातील कोताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी (२३) या गरोदर मातेला शनिवारी रात्रीपासून पोटात दुखणे सुरू झाले.

Mother's death with a baby in the stomach | पोटातील बाळासह मातेचा मृत्यू

पोटातील बाळासह मातेचा मृत्यू

ठळक मुद्देकार्डावर चुकीची माहिती : रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली (गडचिरोली) : रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यात रविवारी सकाळी घडली.
प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत येत असलेल्या सेवारी उपकेंद्रातील कोताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी (२३) या गरोदर मातेला शनिवारी रात्रीपासून पोटात दुखणे सुरू झाले. तिला रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर येथे प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. मात्र कसनसूर येथे प्रसूती करणे शक्य नसल्याने तिला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला डॉ.विजय साबने यांनी दिला. कसनसूर हे गाव एटापल्लीपासून ३० किमी अंतरावर आहे. रुग्णवाहिकेने गरोदर मातेला आणले जात असताना वाटेतच मातेचा मृत्यू झाला. एटापल्ली रुग्णालयात गरोदर मातेला घेऊन रुग्णवाहिका रविवारी सकाळी ८.४५ वाजता पोहोचली. डॉ.कांचन आकरे यांनी तपासणी केल्यानंतर गरोदर मातेला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे बाली उसेंडीला नऊ महिने पूर्ण झाले होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. तर आरोग्य कार्डावर मात्र तिला नववा महिना सुरू असल्याचे लिहिले होते. यावरून गरोदर मातेच्या कार्डवरील तारखा व्यवस्थीत लिहिल्या जात नाही, असे स्पष्ट होत आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोेन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र महिन्यातून १५ दिवस एक डॉक्टर तर १५ दिवस दुसरा डॉक्टर उपस्थित राहतो.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहित आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

दोन महिन्यात तीन मातांचा मृत्यू
वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने मागील दोन महिन्यात तीन गरोदर माता व बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घडल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन वेगाने चालविणे शक्य होत नाही. परिणामी रुग्ण वेळेवर एटापल्ली येथे पोहोचू शकत नाही. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.विजय साबने हे नेहमीच दारू पिऊन कर्तव्यावर राहतात. रुग्णांची बरोबर तपासणी करीत नाही, असा आरोप कसनसूरचे सरपंच सुनील मडावी व घोटसूरचे सरपंच शिवाजी हेडो यांनी केला आहे.

Web Title: Mother's death with a baby in the stomach