नक्षलवाद्यांकडून खून झालेल्या दुर्गुरामचे गावक-यांनी उभारले स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 20:38 IST2018-05-02T20:38:45+5:302018-05-02T20:38:45+5:30
तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावक-यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यांच्या स्मृति जपत गावक-यांनी त्यांचे गावात स्मारक उभारून नक्षल्यांचा निषेध नोंदविला.

नक्षलवाद्यांकडून खून झालेल्या दुर्गुरामचे गावक-यांनी उभारले स्मारक
गडचिरोली - तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावक-यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यांच्या स्मृति जपत गावक-यांनी त्यांचे गावात स्मारक उभारून नक्षल्यांचा निषेध नोंदविला.
१३ मार्च २०१८ रोजी दुर्गुराम यांना ३ ते ४ नक्षल्यांनी कटेझरी ते ग्यारापत्ती मार्गावर अडवून सोबत नेले. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह कटेझरी रोडवर आढळून आला. नक्षलवाद्यांनी दगडाने ठेचून अत्यंत निर्दयीपणे कोल्हे यांची हत्या केली होती.
या हत्येच्या निषेधार्थ कटेझरी गावक-यांनी एकत्र येत नक्षलवाद्यांचा निषेध व्यक्त करत दुर्गराम कोल्हे यांचे गावात स्मारक उभारले. यावेळी कोल्हे यांच्या कुटुंबीयांनी नक्षलवाद्यांनी आपल्या कर्त्या माणसाची हत्या करून आपलं कुटुंब उद्ध्वस्त केल्याचे सांगत आदिवासी लोकांवर अन्याय करणे त्यांनी थांबवावे अशी भावना व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी नक्षलवाद्यांविरोधात आक्रोश व्यक्त करून घोषणाही दिल्या.
नक्षलवाद्यांनी आजपर्यंत ५०० च्या वर आदिवासी व दलित बांधवांचे खून केले आहेत. आपण आदिवासी समाजासाठीच लढत आहोत असे भासवून स्वत:चा स्वार्थ ते साध्य करत असतात. मात्र आदिवासी समाजातील लोक आता नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ लागले आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे.