गटाच्या माध्यमातून यांत्रिक शेती
By Admin | Updated: November 29, 2014 23:21 IST2014-11-29T23:21:17+5:302014-11-29T23:21:17+5:30
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ४५१ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून शेतकरी गटांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होऊ लागला

गटाच्या माध्यमातून यांत्रिक शेती
गडचिरोली : शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ४५१ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून शेतकरी गटांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होऊ लागला असल्याने शेतकरी गटांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती कसण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मनुष्यबळाच्या भरवशावरच शेती केल्या जाते. परिणामी पिकांची लागवड वेळेवर होत नसल्याने उत्पादनात कमालीची घट येत होती. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने प्राप्त केलेले यश बघून सहकार चळवळीच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे बचतगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार राज्यभर शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यांतर्गत सुमारे १ हजार ४५१ शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. या शेतकरी गटांमध्ये १५ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग आहे.
स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांना सुलभ कर्ज पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणी ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्या जाते. त्याचबरोबर समुहशक्तीच्या बळावर ती खरेदी करणेसुध्दा शक्य झाले आहे. शेतकरी गटातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने आवश्यक ते प्रशिक्षण, कौशल्यवृध्दी, शेतकरी अभ्यास दौरे, प्रक्षेत्र भेट, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन, शेतीवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी विशेष सहकार्य केले जात आहे.
चालू वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला मानव विकास मिशन अंतर्गत ३७ व आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने १६ गट असे एकूण ५३ गट स्थापन करण्यात आले. या गटांना भात रोवणी यंत्र, पॉवर ट्रिलर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व रिपर आदी साहित्य पुरविण्यात आले आहेत. इतरही गटांना लहान मोठी कृषी अवजारे पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे यांत्रिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांना फार मोठा हातभार लागत आहे. शेतीपुरक व्यवसाय म्हणून लाख शेती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमध्ये ८० गट स्थापन करण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)