घुसखोरी थांबण्यासाठी होणार उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:24+5:30
लॉकडाऊनच्या कालावधीत या मार्गाने काही नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत होते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर खड्डा तयार केला होता. मात्र कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केल्याने रस्ता पूर्ववत केला आहे. तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले मजूर या मार्गाने परत येण्याची शक्यता आहे.

घुसखोरी थांबण्यासाठी होणार उपाययोजना
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली घाटावरून घुसखोरी होण्याची शक्यता असल्याने अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी या भागाची पाहणी केली.
अहेरीजवळ असलेल्या प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली घाटावर तेलंगणा सरकारमार्फत पुलाचे बांधकाम केले जात आहे. साहित्याची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदाराने नदी पात्रात कच्चा रस्ता तयार केला होता. लॉकडाऊनच्या कालावधीत या मार्गाने काही नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत होते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर खड्डा तयार केला होता. मात्र कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केल्याने रस्ता पूर्ववत केला आहे. तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले मजूर या मार्गाने परत येण्याची शक्यता आहे. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी व अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांनी वांगेपल्ली घाटाला भेट देऊन पाहणी केली. तेलंगणा राज्यात कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत, बांधकामावरील मजूर व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनेटायझर उपलब्ध करून देण्याचे निर्देश तहसीलदार ओतारी यांनी दिले.