शिक्षणाबरोबरच व्यवसायाचेही धडे
By Admin | Updated: February 3, 2015 22:55 IST2015-02-03T22:55:57+5:302015-02-03T22:55:57+5:30
शिक्षण घेतलेल्या मुलींना पुढे बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प कार्यालयाने कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींना दैनंदिन शिक्षणाबरोबरच शिवणकाम,

शिक्षणाबरोबरच व्यवसायाचेही धडे
अहेरी : शिक्षण घेतलेल्या मुलींना पुढे बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प कार्यालयाने कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींना दैनंदिन शिक्षणाबरोबरच शिवणकाम, ब्युटीपार्लर, एम्ब्रायडरी आदी व्यवसायांचे प्रशिक्षण दिले असून अनेक मुलींनी यामध्ये कौशल्यसुद्धा आत्मसात केले आहेत.
अहेरी तालुक्यातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शासनाने इंदाराम येथे मुलींसाठी स्वतंत्र कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयात दुर्गम भागातील बहुतांश आदिवासी समाजाच्या मुली शिक्षण घेत आहेत. वाढत्या स्पर्धेमध्ये या मुलींना शासकीय नोकरी जरी लागली नाही. तरी त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, यासाठी या विद्यार्थिनींना शिवणकाम, ब्युटीपार्लर, एम्ब्रायडरीचे प्रशिक्षण दिले जात आहे. शाळेचे नियमित तास सुटल्यानंतर हे प्रशिक्षण दिले जात आहे.
तिनही प्रशिक्षणासाठी अत्यंत कमी भांडवलाची गरज असून ग्रामीण भागात महिन्याचे सात ते आठ हजार रूपये सहज कमाई होऊ शकते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच सदर प्रशिक्षणाची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनी स्वावलंबी बनण्यास फार मोठी मदत झाली आहे. सदर प्रशिक्षण इंडियन इस्टिट्यूट आॅफ युथ वेल्फेअर नागपूर व एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जात आहे. प्रशिक्षक म्हणून नंदा मद्दीवार, निकिता तोडसाम, सरिता कांडुरवार काम करीत आहेत. प्रशिक्षण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डी. वाय. ढवस यांच्या मार्गदर्शनात दिले जात आहे. याबाबत विद्यार्थिनींनीही समाधान व्यक्त केले आहे.