महागाव (बु.) : अहेरी तालुक्याच्या महागावनजीकच्या मुत्तापूर गावाजवळ दिना नदीवर काही वर्षांपूर्वी पूलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या पुलावर संरक्षक कठडे न लावल्याने अपघाताचा धाेका आहे. या ठिकाणी अनेक किरकाेळ अपघात यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे येथे संरक्षक कठडे लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महागावनजीकच्या मुत्तापूर गावाजवळून दिना नदी वाहते. या नदीवरील पूल कमी उंचीचे व अरूंद आहे. पुलाच्या निर्मितीपासूनच येथे कठडे लावण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे. पुलाचे बांधकाम करताना येथे संरक्षक कठडे लावण्यासंदर्भात अंदाजपत्रकात नमूद आहे. परंतु कठडे लावण्यास बगल देण्यात आली. हा मार्ग वर्दळीचा असल्याने येथे संरक्षक कठडे लावावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.