माणसापेक्षा म्हणे बरे लागते वांगे..
By Admin | Updated: January 5, 2015 23:02 IST2015-01-05T23:02:53+5:302015-01-05T23:02:53+5:30
विनोदी काव्यपंक्ती सादर करून सुप्रसिध्द विनोदी कवी डॉ. मिर्झा बेग यांनी सध्याच्या युगात सर्वच पिकांवर रासायनिक फवारणी केली जात असल्याने माणसाच्या खाण्यातही त्याचा अंश असतो.

माणसापेक्षा म्हणे बरे लागते वांगे..
समाज प्रबोधनही केले : गडचिरोलीत मिर्झा एक्सप्रेस सुसाट धावली
दिलीप दहेलकर - गडचिरोली
‘एक वाघ दुसऱ्या वाघाला असा सांगे
माणसापेक्षा म्हणे बरे लागते वांगे,
माणसात आता राहिली नाही चव
रसायन खाऊ खाऊ झाला बेचव’
अशा विनोदी काव्यपंक्ती सादर करून सुप्रसिध्द विनोदी कवी डॉ. मिर्झा बेग यांनी सध्याच्या युगात सर्वच पिकांवर रासायनिक फवारणी केली जात असल्याने माणसाच्या खाण्यातही त्याचा अंश असतो. त्यामुळे वाघाला माणसाचे मांस बेचव वाटते, असे सांगितले.
डॉ. बेग यांनी भाषा, संस्कृती, शिक्षण, पोलीस व्यवस्था, शेतकरी आत्महत्या, पे्रेम, मराठी, इंग्रजी भाषा, देशाची परिस्थिती आदी विषयांवर प्रकाश टाकला. निमित्त होते, जि.प. शिक्षण विभाग व माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणातील ‘संत ज्ञानेश्वरी नगरीत’ आयोजित ग्रंथ महोत्सव. ग्रंथ महोत्सवाच्या व्यासपीठावर डॉ. मिर्झा बेग यांचा कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मातृभाषा असलेल्या मायमराठी भाषेवर इंग्रजी राजवटीमुळे अद्यापही प्रभाव असल्याचे सांगताना ते म्हणाले,
‘ढेकर देत गेले इंग्रज तिथं जेवून,
पण इंग्रजीचं इथं मढं देलं ठेवून,
मातृभाषा विसरून इंग्रजीत बोलते,
माय साठी दाठ्ठा बंद सासूसाठी खोलते’
मराठी वर्ष असलेल्या गुढीपाडव्यापेक्षा इंग्रजी कॅलेंडरमधील नवर्षाला साऱ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो, हे सांगताना ते म्हणाले,
१ जानेवारीले बायको आली रंगात,
इंग्रजाहीच भुत घुसलं तिच्या अंगात,
लाडावून म्हने मले ओ माय डिअर,
साजरा करू म्हने आपण न्यू ईअर
‘शेतकऱ्यांनो आता घेऊ नका फाशी’, या काव्यपंक्ती सादर करून मिर्झा बेग यांनी शेतकऱ्यांना व्यापक दृष्टीकोण बाळगून जीवन जगण्याचा सल्ला दिला.
काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली,
दाखवली तीनं मले झोयी तिची खाली,
चेहऱ्यावरून वाटत होती थकल्यासारखी,
असं म्हणून मराठी पक्षासारखी फडफडली,
झोपीतून मी उठलो छाती माही धडधडली,
मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत सामावते,
ग्रामगीता गाथाही मराठीतच मावते,
लावणीतून मराठीचे सौंदर्य ओसंडते,
शौर्य आणि औदार्य पोवाड्यातून सांडते,
मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले,
गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले,
अमृताशी पैज जिंकते मराठी बोली
या काव्यातून डॉ. मिर्झा बेग यांनी मराठी भाषेचे अगाध महत्त्व रसिकांना पटवून दिले. त्यानंतर डॉ. मिर्झा बेग यांनी आपल्या विनोदी काव्यातून भोंदूगिरीवरही हल्ला चढविला. गणित, क्रिकेट, धर्म, जात या विषयावरील विनोदी काव्यातून प्रबोधन केले. याशिवाय सध्या टेलिव्हीजनवरील विविध चॅनेलवर दाखविण्यात येत असलेल्या हिंदी मालिकांमधील भंपकपणावर भाष्य केले. महिलांची गाथा व महिमा मोठी असल्याचेही त्यांनी काव्यातून पटवून दिले. अनेक सामाजिक विषयांवर त्यांनी प्रबोधन केले.
या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते आदींसह गडचिरोली शहरातील व परिसरातील हजारो रसिक उपस्थित होते. दरम्यान, रसिक कॉमेडी एक्सप्रेसच्या माध्यमातून हसून, हसून लोटपोट झाले.