तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
By संजय तिपाले | Updated: June 7, 2025 22:01 IST2025-06-07T22:00:44+5:302025-06-07T22:01:00+5:30
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडिगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते.

तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
संजय तिपाले
गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेली सहा मुले बुडाली. ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. सहाही मुले तेलंगणाची असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडिगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या नदीच्या पात्रात आंघोळीसाठी सहा मुले गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तेलंगणा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत मच्छीमारांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे. तेलंगणातील वरिष्ठ मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी या घटनेची माहिती घेतली.
बुडालेल्यांमध्ये यांचा समावेश
पत्ती मधुसूदन (१५), पत्ती मनोज (१३), कर्नाळा सागर (१४), तोगरी रक्षित (११, चौघे रा. आंबटपल्ली, तेलंगणा), पांडू (१८) व राहुल (१९, दोघे रा. कोरलाकुंडा, तेलंगणा) यांचा समावेश आहे.
नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
या घटनेनंतर मुलांच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली.महाकाय पात्रात बुडालेली ही मुले सुखरुप परत यावीत यासाठी देवाचा धावा करत काळीज पिळवटणारा आक्रोश केला, त्यामुळे परिसर सुन्न झाला होता.