नक्षली सावटात हरवले गडचिरोलीचे पर्यटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:05 IST2015-09-27T01:05:14+5:302015-09-27T01:05:14+5:30
जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे.

नक्षली सावटात हरवले गडचिरोलीचे पर्यटन
पर्यटन दिन विशेष : पाहण्यासारखे बरेच काही असूनही पर्यटकांचा पाय मात्र वळत नाही; सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे
गडचिरोली : जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे. एकट्या जंगलाच्या भरवशावर इको पर्यटन होऊ शकते. परंतु १९८० पासून या जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उद्रेक झाल्याने राज्य व देशाच्या अनेक भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांचा पाय गडचिरोलीच्या मातीकडे वळत नाही. त्यामुळे या भागातील पर्यटन केवळ कागदावरच आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये मार्र्कंडा, हेमलकसा, आवलमरी, टिप्पागड, सिरोंचा, खोब्रामेंढा, काशीबेल कुनघाडा, ग्लोरी आॅफ फॉरेस्ट, लख्खामेंढा, डोंगरमेंढा, बिनागुंडा, कोलामार्का, भामरागडचे लाकडाचे रेस्ट हाऊस, भंडारेश्वर मंदिर, वैरागड किल्ला, हत्तीकॅम्प कमलापूर, भवरागड, मेंढालेखा, चंद्राखंडी पहाडी, सोमनूर संगम यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या वनस्पती प्रजाती जंगलात आहे. चपराळा अभयारण्यातही भटकंती करण्याला प्रचंड वाव आहे. ज्यांना जंगल सफारी करायची असेल त्यांच्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात प्रचंड चांगले वातावरण आहे. प्रदूषण नसल्याने निसर्ग पर्यटनाला प्रचंड वाव या ठिकाणी आहे. या सर्व बाबी असतानाही पर्यटन विकासाच्या दृष्टीने आजवर कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. किमान आठवडाभर पर्यटकाला या भागात फिरण्यासारखे प्रचंड वातावरण व स्थळ असताना यादृष्टीने आजवर कधीही प्रयत्न झाले नाही. केवळ नक्षलवाद्यांची दहशत हा एकमेव अडसर पर्यटकांना जिल्ह्यात येण्यासाठी नाही. तर पर्यटनासाठी लागणाऱ्या या आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नसल्याने या जिल्ह्याच्या पर्यटनाविषयी कमालीची उदासीनता दिसून येते. या बाबतचे चित्र बदलविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पाऊल अद्यापही टाकल्या गेलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)