स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे गडचिरोली पुन्हा बनले केंद्र
By Admin | Updated: February 3, 2015 22:54 IST2015-02-03T22:54:38+5:302015-02-03T22:54:38+5:30
स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला.

स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे गडचिरोली पुन्हा बनले केंद्र
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला. या आंदोलनाची मशाल अहेरी राजनगरीतून कायम प्रज्वलित ठेवण्याचे काम राजे विश्वेश्वरराव महाराज व राजे सत्यवानराव महाराज यांनी केले. त्यानंतर आता पुन्हा विदर्भ गर्जना यात्रेच्या निमित्ताने गडचिरोली आंदोलनाचा केंद्रबिंदू झाली आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्या पूर्वीपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी अहेरी ते नागपूर पदयात्राही काढली होती. विदर्भाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग राहायचा. ते कायम विदर्भवादी राहिलेत. त्यानंतर राजे सत्यवान महाराजांनीही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला घेऊन अनेक आंदोलने केलीत व ही मागणी कायम ठेवली. गडचिरोली या काळात विदर्भ आंदोलनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर शहरात ही चळवळ पुढे वाढत गेली. परंतु गेल्या चार-पाच वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात गडचिरोली हा मुख्य केंद्र बिंदू ठरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास गडचिरोलीच्या साधन संपत्तीवर हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा दावा विदर्भवादी नेते करीत आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलनात गडचिरोलीची भूमिका अग्रभागी राहिली आहे. यंदा पुन्हा सिंदखेड राजा ते गडचिरोली अशी विदर्भ गर्जना यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेचा समारोप गडचिरोली येथे ३ मार्च रोजी होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. यात्रा कालेश्वरपर्यंत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कालेश्वर तेलंगणा राज्यात येते. गेल्यावर्षी स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण झाले. विदर्भाची मागणी जुनी असूनही शासनकर्त्यांनी विदर्भावर अन्याय केला, अशी भावना या भागातील जनतेची आहे. मागास भागाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)