- दिगांबर जवादे, गडचिरोली चामोर्शी येथून आष्टीकडे जात असलेल्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. हा अपघात चामोर्शी येथील आष्टी मार्गावर ग्रामीण रुग्णालयाजवळ रविवारी (१८ मे) दुपारी १:३० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विनोद पुंजाराम काटवे (वय ४५), राजेंद्र सदाशिव नैताम (वय ४५) सुनील उष्टूजी वैरागडे (वय ५५, तिघेही रा. हनुमान वॉर्ड गडचिरोली), अनिल मारोती सातपुते (वय ४५, रा. शिवाजी चौक, चामोर्शी) अशी मृतांची नावे आहेत.
यू टर्न ठरला प्राणघातक
विनोद काटवे, राजेंद्र नैताम व सुनील वैरागडे हे तिघेही गडचिरोलीवरून चामोर्शी येथे पोहोचले. चामोर्शी येथून अनिल सातपुते यांना घेऊन आष्टीकडे जात होते. चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जवळपास पोहोचल्यानंतर काही तरी विसरले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कारचालकाने अचानक यू-टर्न घेतला.
ट्रकच्या धडकेने चार वेळा उलटली कार
मागून भरधाव वेगाने ट्रक येत होता. ही बाब कार चालकाच्या लक्षात आली नाही. त्यात ट्रकची कारला जबर धडक बसली. अपघातस्थळी कार चारवेळा उलटली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. तसेच विनोद काटवे, राजेंद्र नैताम, सुनील वैरागडे हे तिघेही जागीच ठार झाले.
वाचा >>भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
अनिल सातपुते हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात येत होते. त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. अपघातस्थळ चामोर्शीपासून जेमतेम एक किमी अंतरावर आहे.
अपघात झाल्याची बातमी चामोर्शी शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. नागरिक व पोलिसांनी चारही जणांना कारच्या बाहेर काढले. कार एवढी क्षतिग्रस्त झाली आहे की, कारचे बहुतांश भाग एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. क्रेनच्या सहायाने कार पोलीस ठाण्यात नेण्यात आली.