सिरोंचात ३५० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
By संजय तिपाले | Updated: November 8, 2025 16:45 IST2025-11-08T16:44:02+5:302025-11-08T16:45:20+5:30
गडचिरोलीत आता आरोग्यक्रांती : तीन राज्यांच्या सीमेवर विकासाची नवी पहाट

Foundation stone laid for 350-bed multispecialty hospital in Sironcha; CM Fadnavis announces
गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख पुसून महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून विकास करण्याचा संकल्प केलेला आहे. जिल्ह्यात दळणवळणातून विकासाचे मार्ग प्रशस्त करत उद्योगक्रांती सुरु आहे. पाठोपाठ आता आरोग्यक्रांतीच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल पडणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली येथे पुण्यातील रुबी हॉस्पिटल ँड वेलनेस प्रा.लि. च्या वतीने ३५० खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय व शैक्षणिक संकुलाच्या इमारतीचे भूमिपूजन ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. १४६८ कोटी रुपयांच्या २६४ एकरवरील या प्रकल्पामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड सीमेवर विकासाचा नवा अध्याय सुरु झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. राणा शिपिंग कंपनीचे संचालक राणा सूर्यवंशी, रुबी हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेझ ग्रँट, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नराेटे, आमदार हेमंत पाटील, नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते. दुर्गम भागात आरोग्य सुविधा तोकड्या होत्या, त्यामुळे रुग्णांना इतरत्र जावे लागत होते, पण या हॉस्पिटलमुळे गडचिरोलीसह शेजारच्या दोन राज्यांतील नागरिकांनाही गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अस्थिरोग, स्त्रीरोग, कॅन्सर तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी आधुनिक सुविधा यात उपलब्ध होतील, राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ या रुग्णालयात रुग्णांना मिळेल, असे त्यांनी सांगितले. राणा ग्रुपने पुण्याहून थेट गडचिरोलीसारख्या भागात हॉस्पिटल उघडण्याची तयारी दर्शवून सामाजिक भान राखल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
शैक्षणिक संकुलाने शिक्षणाला बळ
या संकुलात वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंत आणि नर्सिंग महाविद्यालये उभारण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्रही तयार केले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना याचा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सॅटेलाईटद्वारे कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न सुरु
दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची अडचण आहे. ती दूर करण्यासाठी टॉवर न उभारता थेट सॅटेलाईटद्वारे सुविधा देता येतील का यासंदर्भात स्टार लिंक या कंपनीशी चर्चा झाली आहे. याद्वारे गडचिरोली व नंदूरबार या आदिवासीबहुल व दुर्गम भाग असलेल्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.