मत्स्यपालनाने ५०० बचत गटांना रोजगार
By Admin | Updated: December 22, 2016 02:16 IST2016-12-22T02:16:56+5:302016-12-22T02:16:56+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एटापल्ली, अहेरी, कुरखेडा व धानोरा तालुक्यातील

मत्स्यपालनाने ५०० बचत गटांना रोजगार
उमेद अभियान : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साधला स्वयंसहाय्यता गटासोबत संवाद
धानोरा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एटापल्ली, अहेरी, कुरखेडा व धानोरा तालुक्यातील ५०० महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध झाला आहे. धानोरा तालुक्यातील टवेटोला व महावाडा येथे यवतमाळ तसेच गोंदिया येथील चमूने मत्स्यपालन व्यवसायाला भेट देऊन मत्स्यपालनाची माहिती जाणून घेतली.
महावाडा येथील क्षेत्र भेटीदरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजणे, मत्स्यपालन सल्लागार नीलकंठ मिश्रा, राजेंद्र इंगळे, नेताजी आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उदेगाव, साखेरा, चातगाव, गिरोला, महावाडा येथील स्वयंसहायता महिला बचतगटाच्या सदस्याही उपस्थित होत्या. परंपरागतरित्या करीत असलेल्या मत्स्यपालनास आधुनिकतेची जोड देणे आवश्यक आहे, स्वयंसहाय्यता गटांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. या उपक्रमातील अनुभवाचा फायदा इतर तालुक्यातीलही जनतेला होईल. गडचिरोली जिल्ह्यातच यापुढे मत्स्य बिज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माशांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांची माहिती सादर केली. गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. हजारो मामा तलाव, बोड्या उपलब्ध आहेत. या तलाव व बोड्यांमध्ये मासेमारीचा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येत असून या माध्यमातून रोजगाराची समस्या दूर होण्यास फार मोठी मदत होणार आहे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
मत्स्यपालन आधुनिक होणार
परंपरागत मत्स्यपालनाला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न या उमेद अभियानातून करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातच मत्स्य बिज निर्माण होऊन मत्स्यपालन व्यवसायाला चालना मिळणार आहे. माशापासून तयार होणारे पदार्थही महिला तयार करतील, अशी संकल्पना आहे.