पाचही बालिका विद्यालयाची निकालात भरारी
By Admin | Updated: June 24, 2015 02:36 IST2015-06-24T02:36:48+5:302015-06-24T02:36:48+5:30
जिल्ह्यात पाच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. या विद्यालयाचा सत्र २०१४- १५ चा दहावीचा निकाल सरासरी ९४.२३ टक्के लागला

पाचही बालिका विद्यालयाची निकालात भरारी
शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती : सरासरी ९४.२३ टक्के निकाल
गडचिरोली : जिल्ह्यात पाच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. या विद्यालयाचा सत्र २०१४- १५ चा दहावीचा निकाल सरासरी ९४.२३ टक्के लागला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी ‘लोकमत’ला मंगळवारी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा, भामरागड, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहेत. या विद्यालयामध्ये शाळाबाह्य, दारिद्र्य रेषेखालील स्थलांतरित पालकांच्या मुली, अनाथ, अपंग, एकल पालकत्व असलेल्या मुलींना शिक्षण दिले जाते. मुलींची इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची व निवासाची सोय केलेली आहे. या शाळांमधील १०४ मुली दहावीत शिक्षण घेत होत्या. त्यापैकी १०३ मुलींनी एसएससी परीक्षा दिली असून ९८ मुली उत्तीर्ण आहेत. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्लीचा निकाल १०० टक्के आहे, सिरोंचा ९५.२४, अहेरी ९४, भामरागड ९१.६६, धानोरा ८९.४५ टक्के निकाल लागला आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्लीची पल्लवी जेंगठे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातील पाचही विद्यालयांतुन ७३.६० टक्के गुण घेऊन पहिली आली आहे. धानोरा येथील शाळेत १९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. १७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. भामरागड येथे २४ विद्यार्थिनींपैकी २२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. अहेरी येथे १८ विद्यार्थिनींपैकी १७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. एटापल्ली येथे २२ विद्यार्थिनींपैकी २२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सिरोंचा येथे २० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात एकूण १०३ पैकी ९८ विद्यार्थिनी पाचही कस्तुरबा गांधी शाळेतून उत्तीर्ण झाल्या आहेत. ३१ विद्यार्थिनी प्रथम श्रेणी, ४३ विद्यार्थिनी द्वितीय श्रेणी व २४ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी साखरे यांनी दिली.
या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, जिल्हा समन्वयक एल. डी. चौधरी आदींनी कौतुक केले आहे.