शेतकरी मोबदल्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:35+5:30
प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.

शेतकरी मोबदल्यापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा राज्याचा महत्त्वकांशी मेडीगड्डा प्रकल्प पूर्णत्त्वास आला. परंतु या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या अनेक जमीन मालकांना मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त महसूल विभाग कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. ही अडचण जाणून प्रकल्पग्रस्तांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, वडिलोपार्जीत वारसा हक्काने मिळालेली पोचमपल्ली रै. येथील शेतजमीन प्रकल्पात गेली. या जमिनीव्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारची शेतजमीन नाही. या शेतजमिनीवरच उपजीविका चालविली जात होती. तेलंगणा राज्यातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३० जानेवारी २०१८ मध्ये रितसर रजिस्टर्ड विक्री पत्रान्वये जमीन हस्तांतरित केली. या जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात किंवा धनादेशामार्फत एका आठवड्यात देण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी कबूल केले होते. परंतु पोचमपल्ली येथील एका व्यक्तीने काही खोट्या व बनावटी दस्तावेजांच्या आधारे आपल्या विरूद्ध अवैैध आक्षेप घेतला आहे, असे कारण सांगून प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोबदला अद्यापही दिला नाही.
प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.
अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न
मोबदल्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयाला भेट देऊन मागणी केली. परंतु संबंधित कार्यालयाचे अधिकारी मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असता तेलंगणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्याचे धनादेश सिरोंचा तहसीलदारांकडे वितरित करण्यास पाठविले. परंतु तहसीलदारांसुद्धा याबाबत माहिती घेऊनही पोचमपल्ली येथील काही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धनादेश देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.