गावस्तरावर पोहोचल्या जीवनावश्यक वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:38+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तांदूूळ, गव्हाचे पीठ, डाळ, बेसनाचे पॉकेट, खाद्य तेल, साखर, तिखट पॉकेट, मीठ पॉकेट व हळद पॉकेट आदी साहित्य दिले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने संचारबंदी करण्यात आली असून याची अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या वतीने तालुका प्रशासनामार्फत जिल्हाबाहेरील येथे अडकून पडलेल्या गरजू नागरिकांसाठी गावपातळीवर अन्नधान्य व आवश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहेत.
चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथडे यांच्या सूचनेनुसार तालुक्याच्या भेंडाळा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली. अनेक लोक तसेच मजूर रोजगारासाठी गडचिरोली जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आले आहे. चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून बरेच नागरिक कामानिमित्त वास्तव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तांदूूळ, गव्हाचे पीठ, डाळ, बेसनाचे पॉकेट, खाद्य तेल, साखर, तिखट पॉकेट, मीठ पॉकेट व हळद पॉकेट आदी साहित्य दिले जात आहेत. साहित्य वितरित करताना भेंडाळाचे पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, महसूल विभागाचे निरीक्षक फुलझेले, कोतवाल मोरेश्वर साखरे यांच्यासह भेंडाळा व वाघोली साजाचे तलाठी उपस्थित होते. जि.प. शिक्षकांनी सहकार्य केले.
न.प.उपाध्यक्षांकडून ४०० कुटुंबांना हॅन्डवॉशचे वाटप
चामोर्शी- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून चामोर्शी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम व त्यांचे मोठे बंधू निशांत नैताम यांनी त्यांच्या वॉर्ड क्र. ११ मधील २२० कुटुंबांना तसेच वॉर्ड क्र.२ मधील १८० अशा एकूण ४०० कुटुंबांना हॅॅन्डवॉशचे वितरण करण्यात आले. बंदोबस्ताच्या कर्तव्यावर असलेल्या ५० पोलीस कर्मचाऱ्यांना हॅन्डवॉश प्रदान करण्यात आले.
तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती नसल्या तरी बाहेर गावावरून जसे पुणे, मुंबई, नागपूर येथून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण केल्यानंतर २६ मार्च २०२० पर्यंत १ हजार ६१ व्यक्तींना गृह विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार संजय गंगथडे यांनी दिली आहे.