जंगलातील आगींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

By Admin | Updated: May 30, 2017 00:46 IST2017-05-30T00:46:32+5:302017-05-30T00:46:32+5:30

मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे.

Environmental degradation due to forest fire | जंगलातील आगींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

जंगलातील आगींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

जंगलतोडही कारणीभूत : तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारही लावतात वणवे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे. भौतिक सुखाकरिता मानवी मूल्यांची पायमल्ली होत असल्याने निसर्गप्रेम लोप पावत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण, शेतीविकास, जैविक विकास, अर्थकारण आदी आधुनीकीकरणाच्या नावाखाली जंगलतोड आणि जंगलाना आगी लावणे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या तेंदूपत्ता हंगाम जिल्हाभरात सुरु आहे. यामुळे दुर्गम भागातील आदिवासी, शेतकरी, मजुरांना रोजगार प्राप्त होत आहे, हे सत्य असले तरी अल्प पैशाच्या लालसेपोटी तेंदूपत्ता ठेकेदारांसोबत संगनमत करुन जास्त व दर्जेदार तेंदू पाने मिळण्याच्या हव्यासापोटी अख्खे जंगल भस्मसात केल्या जात आहे. ठेकेदारांच्या खुटकटाईच्या पैशाची बचत होत असली तरी यामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होत आहे. जंगलाला आगी लावल्यामुळे जंगलातील गवतवर्गीय वनस्पती, कीटक, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, पक्षी आदी वन्यप्राण्यांना याची झळ बसत आहे. यामुळे जंगलातील श्वापदे गावाकडे धाव घेत आहेत. देसाईगंज-आरमोरी मार्गावर कित्येकांना वाघाचे दर्शन होत आहे. हे त्याचेच द्योतक आहे. पर्यावरणाचे अर्थात वृक्षांचे संरक्षण करणे आणी संवर्धन करणे हे सजीव सृष्टीच्या भविष्यकालीन अस्तित्वासाठी गरजेचे आहे. लोकसंख्या जितक्या वेगाने वाढत आहे तितक्या वेगाने स्त्रोत वाढू शकले नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे प्रामुख्याने हवा, पाणी, जमीन, वनस्पती, मृदा या स्त्रोतांवर विपरीत परिणाम आपसूकच पडतांना दिसून येत आहे.
दूषितीकरण हरितगृह परिणाम, वातावरण होणारा बदल, ओझोन वायूचा होणारा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थाचा असमतोल, पशुप्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आजपर्यंत तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची ठेकेदारांकडून पिळवणूक झाली. शासनाच्या हे लक्षात आले. ही पिळवणूक थांबावी व मजुरांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने ग्रामसभांना हे अधिकार दिले. जंगल जाळण्याचे अधिकार त्यांना दिलेले नाही, हे येथे महत्त्वाचे. मात्र यावर्षी सदर तेंदूपत्ता तोडाईच्या नावाखाली कित्येक जंगले नष्ट केली गेली आहेत. मार्च महिन्यात खुटकटाई होते. निसर्गाचे तापमान कमीच असते. मग याच महिन्यात जंगलाना आगी का लागतता हे आता सर्वश्रूत झाले आहे. जंगल जळण्याला एकटा ठेकेदार जबाबदार नाही तर तेवढेच जबाबदार ग्रामसभेचे पदाधिकारीही आहेत. जंगलतोडीचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास वनसंपती कायमची नष्ट होईल.

Web Title: Environmental degradation due to forest fire