अंबाडीमुळे महिलांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:24+5:30
ग्रामीण भागात अंबाडी पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात अंबाडी पीक मोठ्या प्रमाणात येते. मात्र शेतकरी त्या पिकाकडे फक्त घरगुती उपयोगी वस्तू म्हणून पाहतात. आपल्या घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून त्या पिकाला तोडून किंवा पेटवून दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून असे घडत आहे. अंबाडीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यापासून तयार होणारे पदार्थ, त्याचा उपयोग आणि बाजारपेठेची उपलब्धता याची माहिती घेऊन ती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे.

अंबाडीमुळे महिलांना रोजगार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि उमेद अभियानाच्या मदतीने बेलगाव/ खैरी येथील क्रांती ग्राम संघाच्या महिलांनी अंबाडीपासून विविध खाद्य पदार्थ निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल केली आहे.
ग्रामीण भागात अंबाडी पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात अंबाडी पीक मोठ्या प्रमाणात येते. मात्र शेतकरी त्या पिकाकडे फक्त घरगुती उपयोगी वस्तू म्हणून पाहतात. आपल्या घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून त्या पिकाला तोडून किंवा पेटवून दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून असे घडत आहे. अंबाडीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यापासून तयार होणारे पदार्थ, त्याचा उपयोग आणि बाजारपेठेची उपलब्धता याची माहिती घेऊन ती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीला जोड पीक म्हणून अंबाडीची लागवड करीत आहेत. शेतीतून निघालेल्या पिकाला ग्राम संघाच्या महिलांनी अंबाडीच्या सुकलेले फुल ९० रूपये किलो तर बिया १० रूपये किलो याप्रमाणे विकत घेत आहेत. अंबाडी फुल आणि बियांपासून खाद्य पदार्थ मूल्यवर्धित करून व्यवसाय सुरू केला आहे. महिलांच्या या व्यवसायाची माहिती करून घेण्यासाठी बाहेर गावाहून अनेक लोक बेलगावाला भेट देत आहेत.
आरोग्यदायी अंबाडी
अंबाडीच्या फुलापासून पावडर, सरबत, जॅम, जिल्ली, लोणचे, चटणी आणि बियांपासून तेल, चटणी, बेसन तर पानांपासून लोणचे आणि भाजी बनविली जाते. अंबडीपासून बनविले जाणारे पदार्थ नुसते खाद्य पदार्थ नसून त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. अंबाडीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणात वाढ होते, दृष्टी क्षमता वाढते. त्वचेवरील रोगांचे संक्रमण कमी करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, पचन सुधारणे, हाडे मजबूत करणे, अभिसरण वाढविणे, रक्तदाब कमी करणे, भूक वाढविणे, मधुमेहापासून संरक्षण आदी फायदे आहेत.