मध संकलनातून राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:45+5:302021-04-28T04:39:45+5:30
आलापल्ली : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन ...

मध संकलनातून राेजगार
आलापल्ली : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सेवायोजन कार्यालय कुचकामीच
गडचिरोली : पूर्वी येथील सेवायोजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखतपत्र पाठविण्यात येत होते. मात्र ऑनलाइन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगार नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाही.
उपकेंद्रांना इमारती नाहीत
गडचिरोली : उपकेंद्रे गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविली जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. परिणामी दुर्गम भागात नागरिकांना त्रास हाेताे.
साखरा बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत असून काही धूळ खात आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन कामाचा बोजवारा उडाला आहे.
चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही; त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. तलावालगत काही नागरिकांनी शेणखताचे ढिगारे ठेवले आहेत.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
काेरची : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणी पंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष आहे.
परवानगीविनाच घरांचे बांधकाम वाढले
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगर परिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र शहरातील बहुतांश घरमालक नगर परिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगर परिषदेने त्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
धानोरा येथील जीर्ण विद्युतखांब बदला
धानोरा : तालुका मुख्यालय असलेल्या धानोरा येथील अनेक वॉर्डातील अनेक विद्युतखांब जीर्ण अवस्थेत असून, ते कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या जीर्ण खांबामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
गृहरक्षकांना पेन्शन लागू करण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून अनेक नागरिक गृहरक्षकपदावर काम करीत आहेत. गृहरक्षकांना १ एप्रिल २०१४ पासून ४०० रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला. मात्र गृहरक्षकांना बारमाही रोजगार मिळत नाही. वर्षातून केवळ सहा महिनेच रोजगार दिला जातो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा निर्माण झाला आहे.
तुकुम येथे पसरली अस्वच्छता
धानोरा : तालुक्यातील तुकुम येथे सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याने गावात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. तुकुम येथील नाल्या पूर्णत: बुजल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. पाणी साचून राहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होरपळ
गडचिरोली : गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सिलिंडरमध्ये दर महिन्याला वाढ होत असल्याने महिनाकाठी सिलिंडरची उचल करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच पंचाईत होत आहे. सरकारने सिलिंडरच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ केली. अनेकांची सबसिडीही बंद झाली आहे. अनेक नागरिक सरपणावरच स्वयंपाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.
शौचालयांची स्वच्छता करा
देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. सदर शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा
चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.
पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.
प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या
आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड स्थान आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलेला नाही.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
विनापरवानगीने घरांचे बांधकाम
गडचिरोली : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दरवर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. या घरांवर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगीने बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत चालली आहे.
सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा
अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने वाहनांचा कर्कश आवाज ऐकावा लागत आहे.
गांधी वॉर्डात फवारणीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारी आहेत.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूधपुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बसस्थानकातील वाहने नियंत्रणाविना
गडचिरोली : येथील बसस्थानक परिसरात प्रवासी, चालक व वाहकांची दुचाकी व चारचाकी वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र कडेकोट व्यवस्था नाही, तसेच शेडही नाही. त्यामुळे नागरिक वाहने अस्ताव्यस्त उभी करतात. पोलीस बंदोबस्ताअभावी बसस्थानक परिसरातील खासगी वाहने रात्री नियंत्रणाअभावी बेवारस राहतात.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात वीज व इंटरनेटची समस्या सतत जाणवत असते. त्यामुळे हस्तलिखित सातबारा पुरवावा, अशी मागणी होत आहे.
आरमोरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रीघरे तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे.