संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्या हातांनी फळ्यावर अक्षरे गिरवत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवायचे होते, त्याच हातांनी हिंसेच्या जोरावर क्रांतीसाठी शस्त्रे उचलली आणि त्याच्या आयुष्याची दिशाच भरकटली. तेलंगणाच्या एका शाळेत शिक्षक म्हणून काम करणारा मुप्पला लक्ष्मण राव ऊर्फ 'गणपती' पाहता पाहता नक्षलवाद्यांचा सुप्रीम कमांडर बनला. त्याचा हा प्रवास एखाद्या थरारपटातील 'व्हिलन'च्या कथेपेक्षाही भयानक आहे. नेपाळ पोलिसांनी 'गणपती'ला ताब्यात घेतल्याच्या वृत्तामुळे गेली पाच दशके सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देणारा हा अदृश्य चेहरा आणि त्याच्या हिंसक आणि दहशतीची थरारक कृत्ये पुन्हा चर्चेत आली.
तेलंगणाच्या करिमनगर जिल्ह्याच्या बिरपूर या छोट्याशा गावात राहणाऱ्या मुप्पला लक्ष्मण राव उर्फ 'गणपती' व्यवसायाने शिक्षक. मात्र, १९७० च्या दशकात नक्षलबारीच्या ठिणगीने पेटलेल्या आगीत तो असा काही होरपळला की, त्याने थेट 'पीपल्स वॉर ग्रुप'मध्ये प्रवेश केला. सुरक्षा यंत्रणांकडे गणपतीचा जो फोटो आहे, तो किमान ४० वर्षे जुना आहे. तो कसा दिसतो? कुठे राहतो? कोणाला भेटतो? हे केवळ त्याच्या अत्यंत जवळच्या 'सेंट्रल कमिटी'च्या सदस्यांनाच ठाऊक असायचे. २००४ मध्ये विखुरलेल्या नक्षलवाद्यांना एकत्र करून त्याने 'भाकप (माओवादी)' ही संघटना उभी केली.
गणपती पायउतार झाला अन् संघटनेला अवकळा आली
तब्बल दहा कोटींचे बक्षीस शिरावर असलेल्या गणपतीने स्वतःहून पदत्याग करून आपला खास शिलेदार नंबाला केशवराव उर्फ बसवराजू यास संघटनेच्या शीर्षस्थानी नेमले पण, बसवाराजूचा मे २०२५ मध्ये छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला. त्यानंतर थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजीकडे संघटनेची सूत्रे आली, पण त्यानेही २२ फेब्रुवारी रोजी तेलंगणात शरणागती पत्करली. नेतृत्वहीन झालेल्या संघटनेचे सदस्य सैरभैर झाले असून, ३१ मार्च २०२६ अखेरच्या डेडलाइनसाठी यंत्रणांनी जोरदार कंबर कसली आहे.
सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देण्यात यशस्वी
२०१८ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे १ महासचिवपदावरून पायउतार झाल्यानंतर गणपती अज्ञातवासात गेला होता. तो फिलिपिन्स किंवा नेपाळमध्ये लपल्याच्या चर्चा होत्या. मात्र, मोस्ट वाँटेड गणपतीला पकडण्यात यंत्रणांना कधीच यश आले नाही.वयाच्या ८० कडे झुकलेल्या गणपतीला मधुमेहासारख्या गंभीर आजाराने घेरले असून, तो आपल्या पत्नीसह भूमिगत जीवन जगत होता. पडद्यामागून तो संघटनेसाठी काम करत होता, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे २०२१ पासून देशभरातील सुरक्षा यंत्रणांना त्याचे लोकेशन सापडत नव्हते. मात्र, त्यास नेपाळच्या सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्याची अटक अथवा आत्मसमर्पण ही माओवादी चळवळीतील सर्वोच्च घडामोड मानली जात आहे.
'गणपती'च्या काळातील १० रक्तरंजीत हल्ले (२००४-२०१८) :
- जहानाबाद जेल ब्रेक (२००५) : ३०० कैद्यांची सुटका
- राणीबोदली हल्ला (२००७): ५५ पोलिस शहीद
- नयागड शस्त्रागार लूट (२००८) : मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा लंपास
- लालगड आंदोलन (२००९) : प्रशासकीय यंत्रणा कोलमडली
- ताडमेटला नरसंहार (२०१०) : ७६ सीआरपीएफ जवान शहीद (सर्वात मोठा हल्ला)
- सिल्दा कॅम्प हल्ला (२०१०) : २४ जवानांची हत्या
- ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस दुर्घटना (२०१०) : रेल्वे रुळाशी छेडछाड, १५० प्रवाशांचा मृत्यू
- सुकमा कलेक्टर अपहरण (२०१२) : अलेक्स पाल मेनन यांचे अपहरण
- झिरम घाटी हल्ला (२०१३) : महेंद्र कर्मा, विद्याचरण शुक्ल यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची हत्या
- बुरकापाल हल्ला (२०१७) : २५ जवान शहीद
Web Summary : From teacher to Maoist leader, 'Ganapati's' journey involved decades of violence. He formed the CPI (Maoist) after uniting splinter groups. Despite a bounty, he remained elusive until his suspected capture in Nepal.
Web Summary : शिक्षक से माओवादी नेता बने 'गणपति' की यात्रा में दशकों की हिंसा शामिल थी। उन्होंने विभाजित समूहों को एकजुट करने के बाद CPI (माओवादी) का गठन किया। इनाम के बावजूद, वह नेपाल में अपनी संदिग्ध गिरफ्तारी तक मायावी बने रहे।